
‘क्या हुआ तेरा वादा’ असा प्रश्न करत शिवसैनिकांनी भाजपने निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांचा पंचनामा केला. भाजपच्या ‘संकल्प’पत्रातील किती आश्वासने पूर्ण झाली असा सवाल शिवसैनिकांनी करताच भाजपचे मंत्री अतुल सावे निरुत्तर झाले. दरम्यान, या आंदोलनाअंतर्गत गुरुवारी मराठवाडय़ात विविध ठिकाणी प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
सत्ता मिळवण्यासाठी भाजप तसेच महायुतीच्या वतीने निवडणुकीच्या काळात आश्वासनांची बरसात करण्यात आली होती. केवळ मतांसाठी शेतकऱयांना वेगवेगळी आमिषे दाखवण्यात आली. मात्र सत्ता मिळताच भाजप, महायुतीला आपल्या आश्वासनांचा विसर पडला. शेतकरी, महिला, तरुण, वृद्धांना वाऱ्यावर सोडणाऱया महायुतीला ‘क्या हुआ तेरा वादा’ असा सवाल शिवसेना करणार असून, त्यासाठी 5 ते 12 जून आंदोलन करण्यात येणार आहे. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करा अन्यथा जनतेच्या असंतोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर येथे राज्याचे इतर मागासवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे हे भाजप कार्यालयात असल्याची माहिती मिळताच शिवसैनिकांनी थेट भाजप कार्यालयावर धडक मारली. शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महानगरप्रमुख राजू वैद्य, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, संतोष जेजूरकर तसेच महिला पदाधिकाऱयांचा समावेश होता.