मुंबईवर कब्जा मिळवण्यासाठी शहा आणि त्यांचा एसंशिं गट कोणत्याही थराला जाईल, मात्र…; संजय राऊत यांनी ठणकावले

भाजप आणि एसंशिं हे एकच आहेत. एसंशिं हा अमित शहा यांचा पक्ष आहे. मुंबईवर कब्जा मिळवण्याचे अमित शहा यांचे स्वप्न आहे. ते महाराष्ट्रद्रोही आहेत, मुंबई उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी त्यांनी यावर कब्जा मिळवायचा आहे. त्यासाठी ते कोणत्याही थराला जातील. मात्र, मुंबईवर कब्जा करण्याचे त्यांचे स्वप्न आम्ही पूर्ण होऊ देणार नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी ठणकावले.

एसंशिं हा अमित शहा यांचाच पक्ष आहे. एसंशिंचे नेते अमित शहाच आहेत. त्यामुळेच शहा यांना हवे तेच एसंशिं गट करत आहे. तसेच शहा यांना मुंबईवर कब्जा मिळवायचा आहे, त्यासाठी ते आणि त्यांचा एसंशिं गट कोणत्याही थराला जाऊ शकतो. मात्र, आम्ही त्यांना मुंबईवर कब्जा मिळवू देणार नाही, असेही संजय राऊत यांनी ठणकावले. राज्यात महाविकास आघाडी आजही भक्कम असून एकत्रितपणे काम करत आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय असल्याने स्थानिक पातळीवरील नेत्यांची मते जाणून घेत आहे. त्याप्रमाणे पक्षाचे धोरण ठरवण्यात येत आहे. तसेच याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सविस्तर उत्तर देणार आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

पक्षनेत्यांचे वाढदिवस कार्यकर्ते साजरा करत असतात. त्या त्यांच्या भावना असतात. आता शिवसेनेचे कार्यकर्ते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह मनसेप्रमुख राज ठाकरे यांनाही शुभेच्छा देत असतील तर त्यात गैर काय आहे. महाराष्ट्राची ही पंरपरा आहे. शुभेच्छांच्या होर्डिंगवर अनेक नेत्यांचे फोटो असतात. शुभेच्छा देण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज लागत नाही. त्यामुळे अशा शुभेच्छांमधून माध्यमांनी वेगळा अर्थ काढू नये, असेही संजय राऊत म्हणाले.

लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही महाराष्ट्रात ताकदीने लढलो. मोदी, अमित शहा आणि भाजप यांच्याविरोधात जनमत होते. जनमताची तीच लाट विधानसभा निवडणुकीवेळीही होती. महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकार जाणार, असे वातावरण होते. तरीही आम्हाला सत्ता मिळाली नाही, याचे कारण सर्वांना माहिती आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याबाबत सविस्तर भाष्य केले आहे. तेच योग्य आहे. त्यामुळे आता कोणावरही खापर फोडणे किंवा कोणालाही दोष देणे योग्य नाही, असे संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्या विधानावर स्पष्ट केले.

शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले. मात्र, जागावाटपात शेवटपर्यंत सुरू असलेल्या चर्चेमुळे काही प्रमाणात त्रास झाला. लोकसभेवेळी जागावाटप सोपे होते. एखाददोन जागा सोडल्यास कोणतेही वाद नव्हते. मात्र, विधानसभेवेळी काही जागांवरून तेढ निर्माण झाली, ती चुकीची होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.