पावसाळी अधिवेशन – शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सलग दुसऱ्या दिवशी सभागृहात रणकंदन, विरोधकांचा सभात्याग

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षाचे सदस्य आज सलग दुसऱ्या दिवशी कमालीचे आक्रमक झाले होते. तीन महिन्यांत राज्यात 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सर्व विषय बाजूला ठेवत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्याची आग्रही मागणी विरोधकांनी केली, पण विधानसभा अध्यक्षांनी स्थगन प्रस्तावरील चर्चा फेटाळल्याने विरोधक आक्रमक झाले आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत सभात्याग केला.

विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास संपल्यावर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगत प्रस्ताव सादर केला होता. पण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नियमावर बोट ठेवत स्थगन प्रस्ताव नाकारला. त्यामुळे विजय वडेट्टीवार संतप्त झाले.

कृषी मंत्री आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्याचा उल्लेख करताना ते म्हणाले की, कृषीमंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात, माजी मंत्री बबनराव लोणीकर शेतकऱ्यांविरोधात आक्षेपार्ह विधान करतात आणि त्यांचा अपमान करतात. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाही. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत, कापसाला भाव मिळालेला नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला दीडपट भाव देऊ असे आश्वासन दिले होते. निवडणुकीआधी कर्जमाफी करू अशी घोषणा केली होती. आता मात्र सरकार समितीला पुढे करत आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी समिती नको अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी मांडली. पण विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात ही गंभीर घटना आहे याबद्दल दुमत नाही, पण या प्रश्नावर इतर माध्यमांतून चर्चा होऊ शकते. उद्या चर्चेला वेळ देतो, पण आता मला नियमानुसार सभागृह चालवायचे आहे असे सांगताच विरोधी बाकावरील सदस्य आक्रमक झाले आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत सभात्याग केला.

महामार्गासाठी पैसे आहेत, शेतकऱ्यांसाठी का नाहीत?

जानेवारी ते मार्च या कालावधीत 767 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. यातील 200 प्रकरणे अपात्र ठरली असून 194 प्रकरणे प्रलंबित आहेत. शेतकरी आत्महत्या करतात त्यांना मदत हे सरकार देत नाही. शक्तिपीठ महामार्गाच्या प्रकल्पासाठी सरकार 20 हजार कोटी मंजूर करतात, पण शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाहीत का? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

हे बेमुर्वतखोर सरकार – भास्कर जाधव

बैल नसल्याने शेतकरी आणि त्याची पत्नी बैलाच्या जागी नांगर ओढतायत असे छायाचित्र दै. ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झाले. त्याचा दाखला देत शिवसेनेच्या भास्कर जाधव यांनी सरकारवर सभागृहात आसूड ओढला. शेतकऱ्यांची हालअपेष्टा होतेय. त्यासंदर्भात विरोधकाने स्थगन प्रस्ताव मांडून चर्चेचा आग्रह धरला. परंतु सरकारने कोणताच प्रतिसाद दिला नसल्यामुळे विरोधक सभागृहाबाहेर पडले. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी सरकार चर्चेला तयार असल्याचे सांगत विरोधकांना चर्चा करायची नाही असे वातावरण तयार केले. म्हणजे हे सरकार किती बेमुर्वतखोर आहे,  अशा शब्दात भास्कर जाधव यांनी सरकारचा निषेध केला.

नांगराला जुंपलेल्या शेतकऱ्याने विधानसभा गदा गदा हलवली; कृषीमंत्र्यांचा फोन, मदतीचे आश्वासन

बैल घ्यायला पैसे नसल्याने लातूरमधील हडोळती गावात अंबादास पवार या शेतकऱ्याने स्वतःला नांगराला जुंपले. बळीराजाची ही दारुण अवस्था ‘सामना’ने महाराष्ट्रासमोर आणली. ‘सामना’ने पहिल्या पानावर प्रसिद्ध केलेला फोटो आज गाजला. नांगराला जुंपलेल्या शेतकऱ्याने विधानसभा गदा गदा हलवली. काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे याकडे सरकारचे लक्ष वेधले. विरोधक आक्रमक झाल्याने विधानसभेतील वातावरण तापले. दरम्यान, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अंबादास पवार यांना फोन लावून व्यथा ऐकली. सरकारकडून शक्य असेल ती मदत तुम्हाला देऊ, असे आश्वासन कोकाटे यांनी दिले.