
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांवर सरकारने फक्त थातूरमातूर कारवाई केली आहे. शिवरायांचा अवमान करा आणि पोलीस संरक्षण मिळावा, असा पायंडा पाडणारे आता सत्तेत बसले आहेत, असे टीकास्त्र काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोडले. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर सपकाळ यांनी आज प्रथमच रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.
हर्षवर्धन सपकाळ यांनी आज रायगडवर येऊन विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी राज्यातील आणि केंद्रातील सत्ताधारी महायुतीवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, आदिलशाही, निजामशाही आणि जातीयवादाविरोधात छत्रपती शिवाजी महाराज लढले. त्यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम काँग्रेसच्या काळात झाले. मात्र शिवरायांचा अपप्रचार करणारे, त्यांचा अवमान करणारे आज सत्तेत बसले आहेत. आदिलशाही, निजामशाही गेली असली तरी देशात जातीयवाद पेरणारे सत्तेत आहेत असेही ते म्हणाले. यावेळी सपकाळ यांनी चवदार तळे आणि महाडचे आराध्यदैवत विरेश्वर महाराज यांचे दर्शन घेतले.
याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर.सी. घरत, जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, अॅड. श्रद्धा ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस नंदा म्हात्रे, उपजिल्हाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, तालुकाध्यक्ष अफजल चांदले, प्रदीप मेहता, श्रेयस गांधी, मुन्ना खांबे आदी उपस्थित होते. किल्ले रायगडच्या दौऱ्यानंतर प्रदेशाध्यक्षांनी डॉ. हिमतराव बावस्कर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.