
बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी चर्चेत असणारे निलंबित उपनिरीक्षक रणजित कसलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. रविवारी कासलेला दिल्लीतून पोलिसांनी अटक केली होती. यानंतर त्याला आज मुंबईतील किल्ला कोर्टात हजर केलं असता, कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलिसांनी कासलेला कोर्टाबाहेर आणले असता त्याने ‘महाराष्ट्र सरकार हाय हाय’, ‘इन्कलाब जिंदाबाद’, अशा घोष दिल्या.
दरम्यान, गेल्या महिन्यात भांडुप येथील एका कार्यकर्त्याने कासले विरोधात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी कासलेविरोधात गुन्हा नोंद केला होता. तसेच कासलेने नुकतेच सोशल मीडियावर राजकीय नेत्यावर टिप्पणीदेखील केली होती. जातीय द्वेष पसरवणे, अधिकाऱ्याची बदनामी करणे, सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर शेअर करण्याच्या आरोपाखाली कासलेला दिल्ली येथून पोलिसांनी ताब्यात घेतले.