समुद्र खवळला, धोक्याचा लाल बावटा फडकला; गेटवे-एलिफंटा, मोरा-भाऊचा धक्का बोट सेवा बंद

खवळलेला समुद्र, खराब हवामान आणि अवकाळी पावसामुळे विविध बंदरात धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून गेटवे-एलिफंटा, गेटवे जेएनपीए, मोरा-भाऊचा धक्का, करंजा-रेवस सागरी मार्गावरील प्रवासी बोट वाहतूक बंद करण्यात आली आहे.

अचानक झालेल्या वातावरणातील बदलाचा फटका सागरी प्रवासी वाहतुकीलाही बसला. त्यातच धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा बुधवारी संध्याकाळपासून विविध बंदरात लावण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून गेटवे ऑफ इंडिया-एलिफंटा गेटवे जेएनपी, मोरा-भाऊचा धक्का, करंजा-रेवस या दरम्यानची सागरी प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली असल्याची माहिती मोरा बंदर विभागाचे निरीक्षक एन.एस. कोळी यांनी दिली. अचानक बोट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने सागरी मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवासी, पर्यटकांची गैरसोय झाली आहे.

मासेमारी बोटी धक्क्याला
वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याच्या इशाऱ्यानंतर मासेमारी बोटीही मोरा, करंजा बंदरात माघारी परतल्या. सुरक्षेसाठी काही दिवस मासेमारी बंद राहणार असल्याची माहिती नॉर्थ वेस्ट साऊथ कोस्ट पर्ससीन नेट फिशरमेन वेल्फेअर असोसिएशनचे संचालक रमेश नाखवा यांनी दिली.