व्याघ्र संवर्धनतज्ज्ञ वाल्मीक थापर यांचं निधन, वयाच्या 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

व्याघ्र संवर्धनवादी वाल्मीक थापर यांचे शनिवारी सकाळी नवी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्यावर दिल्लीतील लोधी विद्युत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

वाल्मीक थापर यांनी आपले संपूर्ण आयुष्य वन्यजीव संरक्षणासाठी, विशेषतः वाघांच्या संरक्षणासाठी समर्पित केले. त्यांनी राजस्थानमधील रणथंभौर राष्ट्रीय उद्यानात वाघांच्यासंवर्धनासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. ते 150 हून अधिक सरकारी समित्या आणि कार्यदलांमध्ये सहभागी होते. यामध्ये पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचाही समावेश होता. 2005 मध्ये त्यांची टायगर टास्क फोर्समध्ये नियुक्ती झाली. ही टास्क फोर्स यूपीए सरकारने स्थापन केली होती. वाल्मिकींचा असा विश्वास होता की, वाघांना वाचवण्यासाठी अशा क्षेत्रांची आवश्यकता आहे जिथे मानवांचा कोणताही हस्तक्षेप नसेल.

ते म्हणाले की, वाघांसाठी नैसर्गिक राखीव क्षेत्र असले पाहिजे, जे फक्त त्यांच्यासाठी असावे. त्यांनी 30 हून अधिक पुस्तके लिहिली आणि संपादित केली. यापैकी ‘लँड ऑफ द टायगर: अ नॅचरल हिस्ट्री ऑफ द इंडियन सबकॉन्टिनेंट’ (1997) आणि ‘टायगर फायर:500 इयर्स ऑफ द टायगर इन इंडिया’ हे प्रसिद्ध आहेत.