
‘नेमेचि येतो पावसाळा’ या म्हणीप्रमाणे लोणावळा शहरात पावसाळा, पर्यटन आणि वाहतूककोंडी, असे समीकरणच बनून गेले आहे. त्यामुळे पावसाळा आला की लोणावळाकर नागरिकांना चिंता लागते ती वाहतूककोंडीची. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या भेडसावत असताना ती सोडविण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना होताना दिसत नसल्याने स्थानिक नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
पूर्वी केवळ पावसाळ्यात व शनिवार, रविवारी होणारी वाहतूककोंडी आता दररोज होऊ लागली आहे. किरकोळ कामासाठी घरातून बाहेर पडले तरी तासन्तास वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यातच वाहने उभी करण्यासाठी कोठेही जागा उपलब्ध नसल्याने बाजारपेठेत गेल्यानंतर ती एक मोठी डोकेदुखी होऊ लागली आहे. लोणावळा हे पर्यटनस्थळ आहे. येथे रोज पर्यटकांची वर्दळ असते. मात्र, येथील रस्ते व वाहनतळे विकसित झाली नाहीत. त्यामुळे नागरिकांना वाहतूककोंडीत अडकून पडण्याची वेळ आली आहे. त्यातच रस्त्यावर झालेली अतिक्रमणे हादेखील कळीचा मुद्दा आहे. ठराविक चौकांमध्येच पोलीस मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग असो किंवा गावातील अंतर्गत रस्ते असो, सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यातच ही कोंडी सोडवण्यासाठी व रस्ते मोकळे करण्यासाठी पोलीस संख्याबळ कमी असल्यामुळे काही ठराविक चौकांमध्येच पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील मुख्य मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गासह गावांमधील अंतर्गत रस्तेदेखील वाहतूककोंडीने तुडुंब होत आहेत. भांगरवाडी रेल्वे गेटच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागत आहेत. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गासह सर्व भागांतील रस्त्यांचे रुंदीकरण करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
लोणावळा शहर हे ज्याप्रमाणे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे ते चिक्कीसाठीदेखील प्रसिद्ध आहे. येथील चिक्की घेण्यासाठी पर्यटक आवर्जून थांबत असतात. मात्र, वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्यामुळे काही वेळा रस्त्यातच वाहने उभी केली जातात. त्यामुळे या वाहतूककोंडीमध्ये अधिकची भर पडत आहे. त्यातच स्थानिक व्यापारीदेखील आपली वाहने दुकानासमोर उभी करतात. त्यामुळे पर्यटकांना वाहने उभे करण्यासाठी जागा मिळत नाही. अशावेळी पर्यटक वाहने सर्रासपणे रस्त्यावर उभे राहतात. त्यामुळेदेखील वाहतूककोंडीला अडथळा निर्माण होत आहे. वाहतूककोंडी सोडवण्यासाठी केवळ पोलीस संख्याबळ असून उपयोग नाही, तर वाहनांसाठी रस्ते, पर्यायी मार्ग व बाजारपेठेत तसेच पर्यटनस्थळांवर वाहनतळासाठी जागा असणे हेदेखील महत्त्वाचे आहे. बेशिस्तपणे कोठेही वाहने उभी करणे हेदेखील वाहतूककोंडी होण्यामागील एक महत्त्वाचे कारण आहे.
संपूर्ण शहराला
गेल्या दोन दशकांचा विचार केला असता, वाहनांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पूर्वी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेद्वारे लोणावळ्यात येणारे पर्यटक आता खासगी वाहने घेऊन येतात. स्थानिकांच्या वाहन संख्येतदेखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामानाने रस्ते वाढलेले नाहीत. लोणावळा शहरात येण्यासाठी रेल्वे लाइन ओलांडून यावे लागते. त्यावर अद्यापि नवीन पूल झालेला नसल्याने रेल्वे गेटचा सामना करतच प्रवास करावा लागतो. गेला संपूर्ण आठवडा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. या आठवड्यातदेखील तीच परिस्थिती कायम आहे. पूर्वी एक दोन ठिकाणी होणारी वाहतूककोंडी आता सर्वदूर होऊ लागली आहे. वाहनांच्या संख्येपुढे येथील रस्ते अपुरे पडत आहेत.