
आधी कोंबडी की आधी अंड? हा प्रश्न विचारून समोरच्याला अनुत्तरित करण्याचा खेळ अजूनही सुरू असतो. पण आता कोंबडीने अंड कधी दिलं या प्रश्नाचं उत्तर अंड विक्रेत्यांना देणं बंधनकारक असणार आहे.
उत्तर प्रदेश सरकारने कुक्कुटपालनासाठी १ अप्रिलपासून प्रत्येक अंड्यावर एक्सपायरी डेट लिहिणं बंधनकारक केलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की बाजारात विकिल्या जाणाऱ्या प्रत्येक अंड्यावर हे देखील असणार आहे की कोंबडीने अंड दिले कधी? पशुपालन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, जे व्यापारी आणि कुक्कुटपालन करणारे नियमाचे पालन करणार नाहीत त्यांच्या पोल्ट्री किंवा दुकानात असलेले अंडे नष्ट करण्यात येतील किंवा ही अंडी खाण्यायोग्य नाहीत अशा प्रकारची शिक्का मारण्यात येईल.
वृत्तात दिलेल्या माहितीनुसार, अंड दिल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यात जर त्याला ३० अंश सेल्सिअसच्या सामान्य तापमानात ठेवले तर ते खाण्यायोग्य असते, किंवा त्याला २ ते ८ अंश सेल्सिअसच्या तापमानात पाच आठवड्यांसाठी ठेवले तर ते खाण्यायोग्य असते. अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमांच्यानुसार अंड्यांना भाज्यांसोबत कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवता येत नाही, कारण त्यांना वेगवेगळ्या तापमानात ठेवण्याची आवश्यकता असते. उत्तर प्रदेशात अंडी ठेवण्यासाठी सध्या फक्त दोन कोल्ड स्टोरेज आहेत. त्यातील एक आग्रा येथे तर दुसरे झाशी येथे आहे.




























































