
>> सिकंदर नदाफ; वाल्हे
माझे जिवींची आवडी ।
पंढरपुरा नेईन गुढी ।।
पांडुरंगी मन रंगले ।
गोविंदाचे गुणीं वेधलें ।।
विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेला माउलींचा पालखी सोहळा महर्षी वाल्मीकी ऋषींची तपोभूमी असलेल्या पुरंदर तालुक्यातील वाल्हेनगरीत आज सकाळी साधारण पावणेबाराच्या सुमारास मुक्कामी दाखल झाला. यावेळी वाल्हेकर ग्रामस्थांनी माउलींच्या पालखी रथावर पुष्पवृष्टी करून उत्साही व भक्तिमय वातावरणात वैष्णवांचे स्वागत केले.
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाचा निरोप घेऊनच माउलींचा आजचा प्रवास कडेपठार रस्त्यावरील नवीन पालखीतळावरून पहाटे सहाच्या सुमारास सुरू झाला. यावेळी विठ्ठलभक्तांनी टाळ-मृदंगाच्या गजरात व अभंगासह हरिनामाच्या जयघोषात मार्गक्रमणास सुरुवात केली. यावेळी नव्याने झालेल्या पालखी मार्गावरून प्रवास करत वैष्णवांचा महासागर तरसदरा िंखडीत न्याहरीसाठी क्षणभर विसावला. यादरम्यान परिसरातील माउली भक्तांकडून वारकर्यांना न्याहरी देण्यात आल्याने न्याहरीवर ताव मारून वारकरीदेखील तृप्तीची ढेकर देताना दिसत होता.
त्यानंतर ढगाळ वातावरणात माउलींचा पालखी सोहळा दौंडज येथे विश्रांतीसाठी थांबला. यावेळी येथील सरपंच अलका माने, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव कदम यांसह ग्रामस्थांनी माउलींच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करून दर्शनासाठी गर्दी केली होती. विश्रांतीनंतर पालखी सोहळा श्री क्षेत्र वाल्हे येथे जाण्यास मार्गस्थ झाला.
पालखी सोहळ्याचा पुणे जिल्ह्यातला चौथा व पुरंदर तालुक्यातील शेवटचा मुक्काम वाल्हेनगरीत असल्याने वाल्हे गावच्या सरहद्दीवर सकाळी अकरा वाजून ४५ मिनिटांनी माउलींच्या पालखीचे आगमन झाले. यावेळी पालखी सोहळ्याचे स्वागत जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांच्यासह सरपंच अतुल गायकवाड, संदेश पवार, सचिन लंबाते, माजी सरपंच दत्तात्रेय पवार, सामाजिक कार्यकर्ते सागर भुजबळ, हनुमंत पवार, सचिन देशपांडे, पोलीस निरीक्षक केशव जगताप, हवालदार प्रशांत पवार, भाऊसाहेब भोंगळे, सुनील पवार, गोरख कदम आदींसह शासकीय, प्रशासकीय पदाधिकार्यांनी व वाल्हेकरांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले.
त्यानंतर पालखी सोहळा सुकलवाडी फाट्याजवळील मुक्काम स्थळावर पावणेएक वाजल्याच्यादरम्यान पोहोचला. यावेळी पालखी सोहळ्याचे स्वरूप व माउलींच्या समाज आरतीस जमा झालेल्या जनसमुदायामुळे संपूर्ण परिसर भक्तिसागरात िंचब झाला होता.
आज नीरा स्नानानंतर पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन
वाल्हे येथील मुक्काम आटोपल्यावर गुरुवारी पहाटे माउलींचे प्रस्थान होणार आहे. यादरम्यान नीरा येथे क्षणभर विसावा घेतल्यानंतर नीरा नदीवरील दत्त घाटावर माउलींच्या पादुकांना स्नान घालण्यात येणार आहे. त्यानंतर माउलींचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करून लोणंदला मुक्कामी असणार आहे.