
उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे पार पडलेल्या सीआयएससीई नॅशनल क्रिकेट स्पर्धेत मुलींच्या अंडर 14 महाराष्ट्र संघात वसंत विहार शाळेच्या तब्बल नऊ मुली खेळल्या. या स्पर्धेत महाराष्ट्र संघ अंतिम फेरीत पोहोचत उपविजेता ठरला होता. आता या शाळेच्या पाच मुलींची 14 वर्षांखालील हिंदुस्थानी संघात वर्णी लागली आहे. त्यामुळे वसंत विहार शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
शालेय क्रिकेटमध्ये महत्त्वाची समजली जाणारी सीआयएससीई नॅशनल क्रिकेट स्पर्धा नुकतीच उत्तर प्रदेश येथील गोरखपूर येथे पार पडली. यात 14 वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे जेतेपदाचे स्वप्न थोडक्यात हुकले. या महाराष्ट्र संघात वसंत विहार शाळेच्या तब्बल नऊ मुली निवडण्यात आल्या होत्या. त्यानंतर या स्पर्धेत खेळलेल्या देशभरातील संघांमधून महाराष्ट्र संघातील आठ मुली या हिंदुस्थानी संघात खेळल्या. यातील पाच मुली या मुख्य संघात आहेत तर तीन मुलींची राखीव म्हणून निवड झाली आहे. तर महाराष्ट्र संघातील या आठ मुलींपैकी पाच मुली या वसंत विहार शाळेच्या आहेत. देलिशा आंगचेकर, जिया भन्साळी आणि रिशा वैद्य या तिघांची मुख्य संघात निवड झाली असून भूवी जाधव आणि आराध्या थोरवे या दोघींची राखीव म्हणून वर्णी लागली आहे. गोयंका शाळा व्यवस्थापन, मुख्य प्रशिक्षक किरण साळगावकर यांनी उत्तम कामगिरी केली.