
मुंबईच्या वेशीवरील वाहतूककोंडी अखेर फुटली आहे. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या वाशी खाडी पुलावर उभारण्यात आलेल्या दोन उड्डाणपुलांपैकी वाशीकड़ून मानखुर्दला जाणारा उड्डाणपूल गुरुवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उड्डाणपुलाचे ऑनलाईल लोकार्पण केले. त्यामुळे अडीच लाख वाहनचालकांना दिलासा मिळाला असून शीव-पनवेल महामार्गावरील वाहतूककोंडीतून सुटका होणार आहे.
वाशी पुलावरील दोन नवीन उड्डाणपुलांपैकी मानखुर्दहून वाशीकडे जाणारा पूल ऑक्टोबरमध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र वाशीहून मानखुर्दला जाणारा उड्डाणपूल काम पूर्ण होऊनही मागील कित्येक महिने उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होता. त्यामुळे मुंबईबाहेरून आलेल्या वाहनांची शहराच्या वेशीवर काही तास कोंडी होत होती. महायुती सरकारला उद्घाटन सोहळय़ासाठी मुहूर्त मिळाला नाही. त्याचा मनस्ताप वाहनचालकांनी सोसला. अखेर गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन पद्धतीने नवीन उड्डाणपुलाचे लोकार्पण केले. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) नवीन दोन उड्डाणपुलांचे काम पूर्ण करण्यात आले असून त्यावर 559 कोटी रुपये खर्च करण्यात आले.
वेगवान प्रवास अन् इंधन, वेळेची बचत
- दोन नवीन उड्डाणपुलांवर प्रत्येकी तीन मार्गिकांप्रमाणे सहा मार्गिकांमुळे मुंबई-नवी मुंबईची वाहतूक अधिक गतिमान होणार.
- वाशी आणि मानखुर्ददरम्यानचा प्रवास आता अवघ्या 10 ते 15 मिनिटांवर आला असून यामुळे दरमहा अंदाजे आठ कोटी रुपयांच्या इंधनाची बचत होणार.
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या वाहनचालकांना दिलासा. वाशी ते विमानतळादरम्यानचा प्रवास 15 ते 20 मिनिटांनी कमी होणार.
वाशी खाडी पुलावर वाहनचालकांना सकाळ-सायंकाळी वाहतूककोंडीची डोकेदुखी सहन करावी लागत होती. त्या पार्श्वभूमीवर नवीन उड्डाणपूल उद्घाटनाला झालेल्या दिरंगाईवर वाहनचालक नाराजी व्यक्त करीत होते. अखेर पर्यावरण दिनाचा मूहूर्त साधत मुख्यमंत्र्यांनी मुंबईकर, नवी मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका केली.