प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन;चित्रपटसृष्टीवर शोककळा

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. 90 च्या दशकात सामाजिक विषयांवर चित्रपट बनवून त्यांनी चाहत्यांची मने जिंकली होती. घोष यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

बंगाली अभिनेत्री रितुपर्णा सेनगुप्ता यांनी घोष यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पार्थो घोष यांचे अचानक निधन इंडस्ट्रीतील सर्व स्टार्स आणि चाहत्यांना मोठा धक्का आहे.या बातमीने आम्हाला मोठा धक्का बसला आहे. आम्ही एक प्रतिभावान, दूरदर्शी दिग्दर्शक आणि एक सुंदर व्यक्ती गमावली आहे. पार्थो दा, तुम्ही पडद्यावर निर्माण केलेल्या जादूसाठी तुम्हाला नेहमीच लक्षात ठेवले जाईल, असे रितुपर्णा यांनी म्हटले आहे.

पार्थो घोष यांची 90 च्या दशकातील सर्वोत्तम दिग्दर्शकांमध्ये नोंद केली जाते. त्यांचे चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून गेले. त्यांनी अनेक सामाजिक मुद्द्यांवर चित्रपट बनवले. पार्थो घोष यांनी 90 च्या दशकात माधुरी दीक्षितचा ‘100 डेज’ आणि मनीषा कोइरालाचा ‘अग्निसाक्षी’ हा चित्रपट बनवून प्रत्येकाच्या हृदयावर आपल्या प्रतिभेचा खोल ठसा उमटवला. 1993 मध्ये त्यांनी मिथुन चक्रवर्ती आणि आयशा झुल्का यांच्यासोबत ‘दलाल’ हा चित्रपटही बनवला. त्यांचा शेवटचा हिट चित्रपट 1997 मध्ये आलेला ‘गुलाम ए मुस्तफा’ होता. त्यात रवीना टंडन आणि नाना पाटेकर यांनी काम केले होते. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी अनेक हिंदी आणि बंगाली टीव्ही शोचे दिग्दर्शनही केले.