विरार लेडीज स्पेशलमध्ये रक्तरंजित घमासान, झिंज्या उपटल्या, डोके फोडले; धक्का लागल्याने लाडक्या बहिणींमध्ये बुक्काबुक्की

गर्दीत केवळ धक्का लागला म्हणून विरार लोकलमधील लेडीज डब्यात दोन ‘लाडक्या बहिणीं’मध्ये तुफान राडा झाला. अर्वाच्य शिवीगाळ करीत दोघींनी एकमेकाRच्या झिंज्या उपटल्या. एका महिलेने दुसरीच्या डोक्यात मोबाईलचे अक्षरशŠ घाव घालून तिला रक्तबंबाळ केले. इतक्यावरच न थांबता त्या मारकुटय़ा महिलेने रक्ताने माखलेल्या महिलेला लोकलमधून बाहेर फेकण्याचाही प्रयत्न केला. आजूबाजूच्या महिलांनी लोकलचे दरवाजे बंद करत ही हाणामारी सोडवली आणि आणखी एक बळी जाताजाता वाचला. ही घटना दहिसर ते भाईंदर रेल्वे स्थानकांदरम्यान घडली. या घटनेचा व्हिडिओ आज व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

17 जून रोजी हाणामारीची ही घटना घडली होती. कविता मेदाडकर (31) या विरारच्या फुलपाडा येथे जाण्यासाठी मीरारोड रेल्वे स्थानकातून लोकलमध्ये चढल्या. त्यावेळी दारात उभ्या असलेल्या ज्योती सिंग (21) या तरुणीला धक्का लागला आणि त्यांचा वाद झाला. पाहता पाहता तुफान राडा झाला. एकमेकीना शिव्यांची लाखोली वाहत केस उपटले. ज्योतीने कविताच्या डोक्यात मोबाईल मारल्याने तिचे डोके फुटले. मात्र प्रचंड रक्तस्त्राव होऊनही हा वाद मिटण्याचे नाव घेत नव्हता. धक्कादायक म्हणजे रक्तबंबाळ झालेल्या कविताचे केस धरून तिला चालत्या गाडीतून बाहेर फेकण्याचा प्रयत्न केल्याचे काही महिलांनी सांगितले. रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे पोलिसांनी याबाबत माहिती मिळताच भाईंदर स्थानकातून या दोघींना ताब्यात घेतले. मात्र कोणीही एकमेकांविरोधात तक्रार न दिल्याने वसई रेल्वे पोलिसांनी केवळ स्टेशन डायरीत या घटनेची नोंद केली आहे. ज्योती ही नायगावच्या गिरीजानगर जुचंद्र येथे राहणारी आहे.

गर्दीचा स्फोट.. तरीही सरकार ढिम्म

पश्चिम, हार्बर तसेच मध्य रेल्वे मार्गावर गर्दीचा स्फोट झाला आहे. मात्र प्रवाशांची संख्या वाढूनही सरकार ढिम्म असल्याने संताप व्यक्त होत आहे. विरार लोकलमध्ये 17 एप्रिल 2025 मध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या नावाने एका महिलेने सहप्रवासी महिलेला शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली होती, तर 2016 मध्ये ऋतुजा नाईक हिला वसईला जाताना महिलांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याने तिला अस्थमाचा अटॅक आला होता. अशा अनेक घटना रोजच घडत असून सरकारला कधी जाग येणार, असा सवाल मुंबईकर चाकरमानी विचारत आहेत.