श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती बैठकीत गोंधळ, सामाजिक कार्यकर्त्यांकडून मंदिरे समिती बरखास्तीची मागणी

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या आषाढी वारीसंदर्भात सुरू असलेल्या बैठकीत सामाजिक कार्यकत्यांनी गोंधळ घालत मंदिरे समिती बरखास्त करण्याची मागणी केली. तसेच बीव्हीजी कंपनीचा ठेका रद्द करावा. ठेकेदारीवर पाच कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा सेवाभावी तत्त्वावर भाविकांना मोफत सेवा करण्याची संधी द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीची बैठक श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास येथे शनिवारी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सामाजिक कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत मंदिरे समिती बरखास्त करण्यात यावी, अशी मागणी केली. मुदत संपूनही समिती कार्यरत आहे. भाविकांच्या हिताचे निर्णय घेण्यात येत नाहीत. मंदिरे समितीला सुरक्षारक्षक पुरवण्याचे काम करणाऱ्या बीव्हीजी कंपनीला दिलेला ठेका रद्द करावा. टेंडर प्रक्रिया राबवू नये. भाविकांचे पाच कोटी रुपये ठेकेदारांच्या घशात घालू नयेत, अशी मागणी करत भाविकांना मंदिरात मोफत सेवा करण्याची संधी द्यावी. भाविक सेवा करण्यासाठी तयार आहेत. पंढरपूरकर सेवा करण्यासाठी तयार आहेत. इतकेच काय राज्यभरातील भाविकही मोफत सेवा करण्यासाठी तयार आहेत. मग पाच कोटींचा ठेका देण्याची गरज काय? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी मंदिरे समिती बरखास्त झालीच पाहिजे,कामगारपुरवठा ठेका रद्द झालाच पाहिजे, अशा जोरदार घोषणा दिल्या. यामुळे काहीवेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प. दत्ता महाराज काळे, गणेश अंकुशराव, संतोष कवडे, संतोष बंडगर, सूरज राठी, भास्करतात्या जगताप, मुन्नाराजे भोसले, विनोद लटके आदी उपस्थित होते.

14 श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती बरखास्त करण्यात यावी म्हणून मागील आठवड्यात आंदोलन केले होते. त्यावेळी आश्वासन दिले गेले. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नाही. मंदिरे समिती बरखास्त करावी, बीव्हीजी कंपनीचा ठेका रद्द करावा, अशी आमची मागणी आहे. – ह.भ.प. दत्तात्रय महाराज काळे, सामाजिक कार्यकर्ते