‘किती विकेट पडल्या हे महत्त्वाचे नाही, विजय महत्त्वाचा’, CDS अनिल चौहान यांनी पाकिस्तानला खडसावले

पुणे विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, या कार्यक्रमात बोलताना त्यांनी पाकिस्तानला स्पष्ट उत्तर दिले आहे. सीडीएस जनरल अनिल चौहान म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरमागील कल्पना पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद थांबवणे होती. ते म्हणाले की, हिंदुस्थान दहशतवादाच्या सावलीत आणि अणु हल्ल्याच्या धोक्यात राहणार नाही.

या कार्यक्रमात त्यांना ऑपरेशन सिंदूर दरम्यान हिंदुस्थानी सशस्त्र दलांना झालेल्या नुकसानाबद्दल विचारले असता, सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी एका क्रिकेट सामन्याचा संदर्भ देत म्हटले की, “एखादा संघ सामना कसा जिंकतो हे महत्त्वाचे आहे. जेव्हा एखादा संघ जिंकतो तेव्हा कोणीच्या किती विकेट पडल्या, हा प्रश्न उपस्थित करत नाही.” ते म्हणाले की, लष्करी दलांवर नुकसानाचा कोणताही परिणाम होत नाही.

सीडीएस जनरल चौहान म्हणाले, “पाकिस्तानला वाटले होते की, ते हिंदुस्थानविरुद्ध 48 तास युद्ध सुरू ठेवतील, परंतु आठ तासांत त्यांनी शरणागती पत्करली आणि वाटाघाटी करण्याची इच्छा व्यक्त केली. 10 मे च्या रात्री पाकिस्तानला समजले की, जर हिंदुस्थानची कारवाई अशीच सुरू राहिली तर त्यांचे खूप नुकसान होईल. या भीतीमुळे पाकिस्तानने हिंदुस्थानशी चर्चा केली. जेव्हा पाकिस्तानकडून चर्चेसाठी आणि तणाव कमी करण्यासाठी विनंती आली तेव्हा आम्ही ती स्वीकारली.”