सरकारला आता तरी जाग येणार का? शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत जयश्री शेळके यांचा संतप्त सवाल

चिखली तालुक्यातील भरोसा या गावाला शेतकरी चळवळीचा एक मोठा इतिहास आहे. त्याच गावात गणेशराव थुट्टे (वय 58) आणि रंजनाताई थुट्टे (वय 55) या दाम्पत्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून 4 दिवसांपूर्वी आत्महत्या केली. शेतीचा ताबा असला तरी त्यांच्या नावाने स्वतंत्र सातबारा नव्हता. अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्त्या ॲड.जयश्रीताई शेळके यांनी भरोसा येथे थुट्टे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी तहसीलदार, चिखली यांच्यासोबत बोलून यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. या दुःखात कुटुंबियांच्या सोबत असल्याची भावना व्यक्त केली. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असून सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट होत असल्याने सरकारने तातडीने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.