
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. या बदललेल्या निवडणुकीच्या तारखेमुळे हजारो शिक्षक TET परीक्षेला मुकणार आहेत. जिल्हा परिषद निवडणूक आणि शिक्षकांच्या CTET परीक्षा एकाच दिवशी असल्याने शिक्षकांमध्ये संभ्रम आहे.
परीक्षेच्या दिवशीच निवडणूक एका दिवशी असल्याने शिक्षक संभ्रमात आहेत. परीक्षा विहित वेळेत पास करणे शिक्षकांना बंधनकारक आहे. त्यामुळे शिक्षक परीक्षेला मुकणार नाही, याबाबत नियोजन करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीने केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2026 च्या पुढे फक्त दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे 30 जानेवारीपर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. या बदलामुळे शिक्षक अडचणीत आले आहेत.


























































