
‘सहार’ विमानतळावरील भारतीय कामगार सेना अंतर्गत मुंबई डय़ुटी फ्री कंपनीचे उत्पन्न वाढूनही कर्मचाऱयांना पगारवाढ दिली जात नसून कर्मचाऱयांना हक्काच्या लाभांपासूनही वंचित ठेवण्यात येत आहे. या ठिकाणचे व्यवस्थापन चालवणाऱया ‘अदानी’कडून कर्मचाऱयांवर अन्याय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱयांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन अदानीच्या अन्यायाला वाचा फोडली. यावेळी शिवसेना स्टाईल लढा देण्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी कर्मचाऱयांना दिले.
सहार विमानतळावरील मुंबई डय़ुटी फ्री कंपनीमध्ये विविध प्रकारच्या स्टोअर्समध्ये सुमारे एक हजारांवर कर्मचारी काम करीत आहेत. या कर्मचाऱयांना गेल्या अनेक महिन्यांपासून सोयीसुविधांपासून वंचित ठेवण्यात येत आहे. जॉब रोटेशन कायदा लागू करण्यासाठी दबाव आणला जात आहे. या कायद्यामुळे देशात कुठेही बदली केली जाणार असून बदलीला विरोध केल्यास संबंधित कर्मचाऱयाला सर्व प्रकारच्या लाभांपासून वंचित ठेवले जाणार आहे. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. यावेळी शिवसेना सचिव-माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना कामगार सेना चिटणीस मनोज धुमाळ, गीतेश राऊत, भारतीय कामगार सेना मुंबई डय़ुटी फ्री युनिट अध्यक्ष इरफान बेग व सर्व कमिटी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
या ठिकाणी अदानी व्यवस्थापनाकडून विविध पॉलिसीच्या नावाखाली कर्मचाऱयांचे मनमानी स्थलांतर करण्यात येत आहे. त्यामुळे भूमिपुत्रांवर मोठा अन्याय होत आहे. या कामगारांना दरवर्षीच्या हक्काच्या पगारवाढीपासून वंचित ठेवण्यात येत असून प्रमोशनही रखडवले जात आहेत. कर्मचाऱयांच्या प्री ऑर्डर इन्सेन्टीव्हमध्ये कपात करण्यात आली आहे. सुरू असलेल्या इन्सेन्टीव्हमध्ये 75 टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱयांची पगारवाढही रखडली आहे. ‘अदानी’च्या या मुजोरीविरोधात शिवसेना स्टाईल लढा देण्याचा निर्धार उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत करण्यात आला.