
मुंबई महानगरपालिका भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेणार असल्यामुळे 8 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मंगळवार 9 डिसेंबर सकाळी 10 वाजेपर्यंत 17 विभागांमध्ये 15 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी या काळात पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
तानसा धरणातून भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी 2750 मिलीमीटर व्यासाची तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. यामध्ये जुनी जलवाहिनी काढून नवीन जलवाहिनी बसवण्यासाठी काही कामे प्रस्तावित आहेत. त्यासाठी साधारणतः 24 तासांचा कालावधी आवश्यक आहे. या कामकाजामुळे भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रास होणाऱया पाणीपुरवठय़ामध्ये सुमारे 15 टक्के घट होणार आहे.
दरम्यान, यापूर्वी, 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून 4 डिसेंबर रोजी सकाळी 10 काजेपर्यंत पाणीपुरवठय़ात 15 टकके कपात लागू करण्याचे प्रस्तावित होते. तथापि, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी मुंबई महानगरात येणार असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सदर जलवाहिनीचे काम पुढे ढकलून 15 टक्के पाणीकपात रद्द करण्यात आली होती. दरम्यान, पाणी कपातीमुळे नागरिकांनी, पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या विभागांमध्ये परिणाम
जलवाहिनीच्या कामामुळे मुंबई शहर विभागातील ए फोर्ट परिसर, सी मुंबई सेंट्रल, डी ग्रँट रोड, जी दक्षिण वरळी, जी उत्तर विभाग दादर; पश्चिम उपनगरातील एच पूर्व, एच पश्चिम वांद्रे परिसर, के पूर्व, के पश्चिम कुर्ला, पी दक्षिण गोरेगाव, पी उत्तर मालाड, आर दक्षिण कांदिवली, आर उत्तर दहिसर, आर मध्य बोरिवली विभाग आणि पूर्व उपनगरातील एन घाटकोपर, एल कुर्ला आणि एस भांडुप विभाग अशा एकूण 17 प्रशासकीय विभागांना होणाऱया पाणीपुरवठय़ात कपात केली जाणार आहे.

























































