
मुंबईतील मालाड परिसरात रस्ते अपघाताच्या किरकोळ वादातून एका 25 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मालाड येथील इनॉर्बिट मॉलजवळील लिंक रोडवर ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी कॅब चालक आणि त्याच्यासोबत असलेल्या एका प्रवाशाला अटक केली आहे.
शारिक अन्सारी असे मृत तरुणाचे नाव असून तो मालवणी येथील रहिवासी होता आणि एका डिजिटल मार्केटिंग कंपनीत कार्यरत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शारिक आपल्या दुचाकीवरून जात असताना त्याची दुचाकी समोर असलेल्या एका कॅबला किंचित धडकली. यावरून कॅब चालक सत्येंद्र गुप्ता याने शारिक याच्य बाईकचा पाठलाग करुन कॅब ओसवाल मेट्रो स्टेशनजवळ थांबवून शारिकचा रस्ता अडवला. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. रागाच्या भरात सत्येंद्रने ली वाद वाढत गेल्याने शारिकने आपल्या हेल्मेटने कॅबच्या विंडशील्डवर प्रहार केला, ज्यामुळे काच फुटली.
या घटनेमुळे संतापलेल्या सत्येंद्र गुप्ताने गाडीतून धारदार शस्त्र बाहेर काढले आणि शारिकवर हल्ला केला. हे वार शारिकच्या छातीत आणि मानेच्या मागील बाजूस लागल्याने तो गंभीर जखमी झाला. विशेष म्हणजे, वाद सुरू असताना सत्येंद्रने स्वतः पोलिसांना फोन करून भांडणाची माहिती दिली होती, मात्र पोलीस पोहोचण्यापूर्वीच त्याने शारिकवर प्राणघातक हल्ला केला होता. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी सत्येंद्र गुप्ता आणि त्याच्यासोबत असलेला प्रवासी सुनील पाल या दोघांनाही ताब्यात घेतले. डीसीपी संदीप जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


























































