
चवीचे जेवण बनवत नसल्याने नातवाने आजीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले. यात आजीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या नातवाला उच्च न्यायालयाने जामीन नाकारला.
न्या. सारंग कोतवाल व न्या. एस. एम. मोडक यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. आजी जळत असताना आरोपी नातू दरवाजात उभा होता. तिला वाचवण्यासाठी तो कोणालाचा घरात जाऊ देत नव्हता, अशी साक्ष एका साक्षीदाराने दिली आहे. जामीन मंजूर करावा,असा एकही मुद्दा आरोपीने सादर केलेला नाही, असे नमूद करत न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला.
काय आहे प्रकरण
शरद साळुंखे असे या आरोपीचे नाव आहे. तो सातारा येथील रहिवासी आहे. ही घटना 11 सप्टेंबर 2019 रोजी घडली. साळुंखेने त्याच्या आजीला पेटवून दिले. शेजारच्यांनी तिला रुग्णालयात नेले. तेथे पोलिसांनी तिचा जबाब घेतला. साळुंखेने रॉकेल ओतून जाळल्याचे आजीने पोलिसांना सांगितले. नंतर आजीचा मृत्यू झाला. पोलिसांनी साळुंखेविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला. सातारा सत्र न्यायालयाने साळुंखेला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या शिक्षेला त्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. जामिनासाठीही अर्ज केला होता. तो न्यायालयाने फेटाळून लावला.
घरगुती वादामुळे अडकवले
मृत्यूपूर्वी जबाब नोंदवताना काही नातलग तेथे उपस्थित होते. नंतर सर्वांना तेथून बाहेर जाण्यास सांगितले. याचा अर्थ नातलगांनीच माझ्याविरोधात जबाब देण्यास आजीला सांगितले असल्याची शक्यता आहे. कुटुंबात मालमत्तेवरून वाद आहे. या वादामुळेच मला या प्रकरणात अडकवले आहे, असा दावा साळुंखेने केला, तो न्यायालयाने मान्य केला नाही.