मोदी-शहांची पापंच इतकी शंभर जन्म घेतले तरी स्वर्गात जाणार नाहीत, खरगेंचा संताप

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी एकत्र इतकी पापं केली आहेत की, ते पुढील 100 जन्म घेतले तरी स्वर्गात जाणार नाहीत. लोकांच्या शापामुळे ते नरकात जातील, असा संताप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज महाकुंभमेळ्यात संगमावर स्नान केले. यापूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही गंगास्नान केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही प्रयागराजला येणार आहेत. या पार्श्वभूमीवर खरगे यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपा नेत्यांमध्ये गंगेत डुबकी घेण्यासाठी अक्षरश: स्पर्धा लागली आहे. जोपर्यंत टीव्हीवर व्यवस्थित दिसत नाहीत तोपर्यंत हे नेते डुबकी घेत राहतात, असा टोला खरगे यांनी हाणला.

महू येथे काँग्रेसच्या जय भीम, जय बापू, जय संविधान रॅलीत खरगे बोलत होते. धर्मावर आपल्या सर्वांचीच आस्था आहे. धर्म आपल्या सर्वांसोबत आहे. परंतु, धर्माच्या नावावर कुठल्याही समाजात गरिबांचे शोषण झाले तर आम्ही ते कदापि खपवून घेणार नाही, असे खरगे म्हणाले. गंगेत डुबकी घेतल्यानंतर तरुणांना रोजगार मिळेल का, गरिबी दूर होईल का, दोनवेळचे जेवण मिळेल का? असे सवाल खरगे यांनी केले. मला कुणाच्याही श्रद्धेला धक्का लावायचा नाही, परंतु, देशात मुले शाळेत जात नाहीत, मजुरांना मजुरी मिळत नाही, याचे काय, असा प्रश्नही खरगे यांनी उपस्थित केला.

अमित शहा म्हणतात की, जितक्या वेळा आंबेडकरांचे नाव घेता तितक्या वेळा देवाचे नाव घेतले असते तर देव भेटला असता. हे असे लोक आहेत. त्यामुळे जर जिवंत राहायचे असेल तर लढा तेव्हाच शहांसारखे लोक पळून जातील, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.