
रणजी विजेत्या मुंबईला रणजी करंडकाच्या बाद फेरीत स्थान पक्के करण्यासाठी केवळ मेघालयाविरुद्ध बोनस गुणासह विजयाची आवश्यकता नसून बडोद्याचा पराभवही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यातच आगामी इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि यशस्वी जैसवाल हे खेळणार असल्यामुळे तिघांशिवाय मुंबईला दुबळय़ा मेघालयविरुद्धचा अत्यंत महत्त्वाचा सामना खेळावा लागणार आहे.
मुंबईला जम्मू आणि कश्मीरविरुद्धचा सामना जिंकून रणजी करंडकाच्या बाद फेरीत सर्वप्रथम धडक मारण्याची नामी संधी होती. मात्र या सामन्यात बलाढय़ मुंबईला जम्मू आणि कश्मीरकडूनच पाच विकेटनी पराभवाची नामुष्की सहन करावी लागली. या पराभवामुळे मुंबईवर साखळीतच बाद होण्याचे संकट ओढावले आहे. विशेष म्हणजे या सामन्यासाठी मुंबई संघात सहा आंतरराष्ट्रीय खेळाडू होते तर जम्मू आणि कश्मीरच्या एकाही खेळाडूसाठी अद्याप हिंदुस्थानी संघाचे दार उघडलेले नाही. तरीही या अननुभवी संघाने जोरदार खेळ करत मुंबईला आधी झुंजवले आणि नंतर पराभवाचा धक्काही दिला. आता या विजयामुळे अखेरच्या सामन्यात ते सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवला तरीही ते बाद फेरी गाठू शकतील.
…तरच मुंबईची बाद फेरी निश्चित
मुंबईला रणजीचे जेतेपद राखायचे असेल तर आधी त्यांना बाद फेरी गाठावी लागणार आहे आणि सध्या ते मुंबईच्या हातात राहिलेले नाही. मुंबईचे भवितव्य जम्मू आणि कश्मीर-बडोदा यांच्यात होणाऱया साखळी सामन्यावर अवलंबून आहे. सर्वात आधी मुंबईला मेघालयाचा डावाने किंवा दहा विकेटनी पराभव करून 7 गुणांची कमाई करावी लागणार आहे. बोनस गुणांसह विजय मिळवल्यास मुंबईची गुणसंख्या 29 होईल आणि ते जम्मू आणि कश्मीरच्या 29 गुणांची बरोबरी साधतील. त्याचबरोबर बडोद्याचा किंवा जम्मू आणि कश्मीरचा पराभव अनिवार्य आहे. मात्र बडोदा विजयी ठरला तर ते बाद फेरी गाठतील आणि त्यानंतर मुंबई आणि जम्मू-कश्मीर यांच्यातील एक संघ सरस धावगतीच्या आधारे बाद फेरीतील आपले स्थान निश्चित करतील. तसेच बडोदा पराभूत झाला तर मुंबई थेट उपांत्यूर्व फेरी गाठेल.
मेघालयाचा पराभवाचा षटकार
रणजी करंडकातील सर्वात दुबळा संघ म्हणून मेघालयाची गणती केली जाते. साखळीतील सहाही सामन्यांत त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यापैकी चार सामने ते चक्क डावाने हरले आणि एक सामना दहा विकेटनी. म्हणजे मुंबईलाही या सामन्यात बोनस गुणासह विजय मिळवणे कठीण नाही.
- मुंबईचा संघ – अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, अंगक्रिश रघुवंशी, अमोघ भटक, सिद्धेश लाड, आकाश आनंद (यष्टिरक्षक), हार्दिक तामोरे (यष्टिरक्षक), सूर्यांश शेडगे, शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी, तनुष कोटियन, मोहित अवस्थी, सिल्व्हेस्टर डिसूझा, रॉयस्टन डायस, श्रेयस गुरव, अथर्व अंकोलेकर.
- मेघालय – किशन लिंगडोह, आर्यन बोरा, अर्पित भटेवरा, निशांता चक्रबर्थी, अभय चौधरी, हिमान फुकान, रिबोकलांग हेनीता, आदर्श जोशी, लॅरी संगमा, एरियन संगमा, रॉबर्ट संगमा, नफीस सिद्दिकी, स्वरजीत दास, इबीतलांग थाबा, रोशन वारबा.
आजपासून बाद फेरी गाठण्यासाठी संघर्ष
रणजी करंडकाच्या साखळी स्पर्धेतील शेवटचा सामना गुरूवारपासून सुरू होतोय आणि विदर्भ हा एकमेव संघच बाद फेरी गाठू शकला आहे. उर्वरित सात संघ अजूनही अनिश्चित आहेत. स्पर्धेत खेळत असलेल्या 32 संघापैकी 14 संघांना बाद फेरी गाठण्याची संधी आहे. ‘अ’ गटातून जम्मू आणि कश्मीर, मुंबई आणि बडोदा यापैकी कोणतेही दोन संघ बाद फेरी गाठू शकतात. ‘ब’ गटात विदर्भने बाद फेरी गाठण्याबाबत पहिला नंबर लावला असला तरी गुजरात आणि हिमाचल प्रदेश यांच्यापैकी विजयी संघ बाद फेरी गाठू शकतो. ‘क’ गटात केरळसाठी बाद फेरी फार सहज असली तरी हरयाणा आणि कर्नाटक यांच्यातील निकाल बाद फेरीचा फैसला करणार आहे. ‘ड’ गटात तामीळनाडू आणि चंदिगड यांचा बाद फेरी प्रवेश सोप्पा मानला जात असला तरी सौराष्ट्र, रेल्वे, झारखंड आणि दिल्ली यांनाही बाद फेरी प्रवेशाची अंधुकशी संधी आहे. फक्त बोनस गुणासह मिळवलेला विजयच त्यांचे बाद फेरीतील दार उघडू शकतो.