प्रदेश काँग्रेसमध्ये बदलाचे वारे; अध्यक्षपदासाठी अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजीत कदम यांची नावे आघाडीवर

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवानंतर प्रदेश काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलाची जोरदार चर्चा आहे. नाना पटोले यांना अध्यक्षपदावरून बाजूला करून पक्षातील युवा नेतृत्वाकडे  जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे. यासाठी अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजीत कदम यांच्या नावाची चर्चा अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहेत.

प्रदेश काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाबाबत राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर नेतृत्व बदलण्याची मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी मंगळवारी दिल्लीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेऊन चर्चा केली. यामुळे नवा प्रदेशाध्यक्ष कोण? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

हर्षवर्धन सकपाळ यांचीही चर्चा

प्रदेशाध्यक्षपदासाठी कोल्हापुरातून सतेज पाटील, लातूरमधून अमित देशमुख यांच्यात स्पर्धा पाहायला मिळत आहे. सांगलीतून युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष विश्वजीत कदम यांचेही नाव समोर येत आहे. त्यातच बुलढाण्यातील काँग्रेसचे निष्ठावान आणि आदिवासी नेते हर्षवर्धन सपकाळ यांचे नावही अध्यक्षपदासाठी पुढे येत आहे.