एसटीला मिंध्यांच्या मेळाव्याला जुंपले; बारावीच्या विद्यार्थ्यांचे हाल, चेंगराचेंगरीत गाठावे लागले परीक्षा केंद्र

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरीतील आभार मेळाव्यासाठी गर्दी जमण्याकरिता रत्नागिरीसह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांतून एसटी बस आरक्षित करून आणण्यात आल्या होत्या. बारावीची परीक्षा सुरू असताना एसटी बस राजकीय मेळाव्यासाठी पाठवण्यात आल्यामुळे अनेक ठिकाणच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्याचा फटका विद्यार्थ्यांसह नागरिकांना बसला. मिळेल ती गाडी गाठून चेंगराचेंगरी करत विद्यार्थ्यांना आज परीक्षा केंद्र गाठावे लागले.

रत्नागिरीतील चंपक मैदान येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आभार मेळावा दुपारी अडीच वाजता आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी गर्दी जमवण्याकरिता एसटी बस आरक्षित करण्यात आल्या होत्या. रत्नागिरी जिह्यातून 205 एसटीच्या गाडय़ा आरक्षित करण्यात आल्या होत्या. राजकीय मेळाव्यासाठी गाडय़ा पाठवण्यात आल्यामुळे अनेक दैनंदिन फेऱया रद्द करण्यात आल्या. त्याचा फटका आज बारावीच्या विद्यार्थ्यांना बसला. विद्यार्थ्यांना ताटकळत गाडीची वाट पाहावी लागली आणि मिळेल त्या गाडीने चेंगराचेंगरी करत परीक्षा केंद्र गाठावे लागले. परतीच्या प्रवासातही विद्यार्थ्यांचे हाल झाले. राजकीय मेळाव्यासाठी गाडय़ा गेल्यामुळे त्याचा फटका नोकरदार वर्ग तसेच इतर प्रवाशांनाही बसला.

स्वतःचा टेंभा मिरवण्यासाठी उदय सामंतांचा अट्टहास – विनायक राऊत

आज बारावीचा पेपर होता. खेडय़ापाडय़ातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी एसटी हे एकमेव साधन आहे. आज पालकमंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या राजकीय मेळाव्याला गर्दी करण्यासाठी रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, कराड आणि सातारा येथून एसटी बस आरक्षित करून आणल्या होत्या. बारावीच्या विद्यार्थ्यांचा कोणताही विचार न करता केवळ आपले प्रस्थ दाखवण्यासाठी, आपला टेंभा मिरवण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी हा अट्टहास केला. त्याचा मी धिक्कार करतो. आज जो काही विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला त्याला हा मिंधे गट आणि तथाकथित मंत्री जबाबदार आहेत, असा आरोप शिवसेना नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी केला.