मराठीला अभिजात दर्जा देणारे सरकार कोण? मराठवाडा साहित्य संमेलनात ठाले पाटलांचा दांडपट्टा

संत ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ लिहिली तेव्हाच मराठी अभिजात भाषा झाली. मराठीला अभिजात दर्जा देणारे सरकार कोण? पेंद्र सरकारने अभिजात हा शब्दप्रयोग केलेला नाही, तर मराठी ही शास्त्राची म्हणजे ज्ञानाची भाषा असल्याचे म्हटले आहे. हा सगळा खटाटोप दर्जाच्या नावाखाली मिळणाऱ्या 300 कोटींसाठी असावा. पण राज्य सरकारने या 300 कोटींसाठी भीक मागू नये. पुढारी आणि त्यांचे बगलबच्चे गोळा करत असलेली खंडणीची रक्कम गोळा केली तरी मराठी भाषेसाठी खूप काही करता येईल… मसापच्या मराठवाडा साहित्य संमेलनात अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांचा दांडपट्टा चालला आणि व्यासपीठावरील मिंध्यांच्या मंत्र्याचा चेहरा बघण्यालायक झाला!

छत्रपती संभाजीनगरातील वाळूज महानगरात आज 44 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन झाले. या उद्घाटनाच्या कार्यक्रमातच  मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी मराठीच्या अभिजात दर्जावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारला जबरदस्त खडे बोल सुनावले. भाषा अभिजात नसते, तर त्यातील साहित्य अभिजात असते. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हाच मराठी भाषा अभिजात बनली. मराठीला अभिजात दर्जा देणारे सरकार कोण? असा सवाल कौतिकराव ठाले पाटील यांनी केला.

सामाजिक कल्याणमंत्र्यांचा चेहराच उतरला

मसापच्या साहित्य संमेलन उद्घाटनासाठी मराठी भाषा मंत्री उदय सामंत येणार होते. परंतु ते आले नाहीत. दुसरे मंत्री संजय शिरसाट हे लेटलतीफ! या दोन्ही मंत्र्यांचा कौतिकराव ठाले पाटलांनी चांगलाच समाचार घेतला. ठाले पाटलांची तळपती तलवार पाहून मिंध्यांच्या मंत्र्याचा चेहराच उतरला.