वरळी कोळीवाड्यातील जेट्ट्यांच्या पुनर्बांधणीसाठी तातडीने निधी द्या! आदित्य ठाकरे यांचे अजितदादांना पत्र

वरळी कोळीवाडय़ातील जेट्टय़ांच्या पुनर्बांधणीसाठी तातडीने निधी द्या, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.

आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात अजित पवार यांना पत्र लिहिले आहे. वरळी कोळीवाडय़ातील जेट्टय़ांची दुरवस्था झाली असल्याने कोळी बांधवांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांची गैरसोय दूर होण्यासाठी येथील जेट्टय़ांची पुनर्बांधणी आवश्यक असल्याचे आदित्य ठाकरे यांनी या पत्रात नमूद केले आहे. आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली आहे.

वरळी कोळीवाडा परिसरातील क्लिव्हलॅण्ड बंदर जेट्टी, बत्तेरी जेट्टी, श्री बंदरकर जेट्टी, विकास गल्ली, क्रांती लेन, तरे गल्ली व नवनीत चौक येथील जेट्टय़ा सध्या अत्यंत जीर्ण अवस्थेत असून जेट्टय़ांचे संरचनात्मक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. त्यामुळे स्थानिक कोळी समाजाला माशांच्या ने-आणीत मोठय़ा अडचणींचा सामोरा करावा लागत आहे. यामुळे त्यांच्या दैनंदिन उपजीविकेवर गंभीर परिणाम होत आहे. स्थानिक रहिवाशांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे आदित्य ठाकरे यांनी या पत्रात नमूद केले आहे.