मुंबईत पाणी तुंबण्याची ठिकाणे वाढली, मुंबई महापालिकेचा दावा ठरला खोटा; आणखी 16 ठिकाणांची पडली भर

मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबणाऱ्या ठिकाणांची संख्या कमी होण्याऐवजी आता वाढ झाली आहे. गेल्या वर्षी मुंबईतील एपूण पूरप्रवण क्षेत्र जिथे 386 होती तिथे ही ठिकाणे आता 453 एवढी झाली आहेत. गेल्या वर्षी यातील 60 ठिकाणांवर नियंत्रण मिळवता आले नव्हते. मात्र, आता त्यात वाढ होऊन नियंत्रण न मिळवता येणाऱ्या ठिकाणांची संख्या 86 झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणी तुंबण्याची ठिकाणी 16 ने वाढली आहेत. त्यामुळे मुंबईतील पाणी तुंबण्याची ठिकाणे कमी झाली आहेत, हा पालिकेचा दावा खोटा ठरला आहे.

मुंबईमध्ये मागील वर्षी 386 पूरप्रवण क्षेत्रे आढळून आली होती. त्यापैकी 326 पूरप्रवण क्षेत्रांमधील पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून उर्वरित 60 पूरप्रवण क्षेत्रांचे मुंबई महानगरपालिका व इतर संस्थांनी निराकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला होता. परंतु या वर्षी महापालिकेने या एपूण पूरप्रवण क्षेत्रांची संख्या 453 एवढी झाली असून यापैकी केवळ 369 पूरप्रवण क्षेत्र नियंत्रणात आणल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आजही मुंबईत 86 अशी ठिकाणे आहेत जिथे पावसाळ्यात पाणी तुंबण्याची दाट शक्यता आहे.

तुंबण्याची ठिकाणे का वाढलीत

मुंबईत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची, खड्डे भरण्याची कामे सुरू असतात. अशा वेळी काही वेळी उंचसखल भाग निर्माण होतो. त्यामुळे मुंबईत नव्याने पाणी तुंबण्याची काही ठिकाणे निर्माण झाली आहेत. दरम्यान, काही ठिकाणी नैसर्गिकरीत्या उंच सखलपणा असल्याने तिथे अतिवृष्टीत पाणी साचण्याची समस्या पावसाळ्यात उद्भवतातच. काही वेळा पर्जन्य जलवाहिनीचा अंतर्गत भागात काही ठिकाणी गाळ साचून पाणी तुंबण्याचा प्रकार घडतो. मात्र, सर्व ठिकाणी खबरदारी घेत पालिका कंप लावून तत्काळ पाणी उपसा करते.

पाणी साचणारी एपूण ठिकाणे 

(सन 2024 ः 453) (सन 2023 ः 386)

पाण्याचा निचरा होणारी क्षेत्र

(सन 2024 ः 369), (सन 2023 ः 326)

नियोजन स्तरावरील पूरप्रवण क्षेत्र

(सन 2024 ः 11), (सन 2023ः04)

सरकारी प्राधिकरण तथा खासगी मालक यांच्या समन्वयाने हाताळावयाची पूरप्रवण क्षेत्रे (सन 2024 ः 18), (सन 2023 ः 36)

काही प्राधिकरणांमध्ये समन्वयाचा अभाव 

पावसाळ्यात मुंबई महापालिका, रेल्वे, नौदल तसेच विविध प्राधिकरणे पाणी तुंबू नये म्हणून एकमेकांशी समन्वय साधून काम करत असतात. मात्र, मुंबईतील काही ठिकाणे अशी आहेत की, तिथे समन्वयाचा अभाव जाणवतो. काही वेळा एसआरए तसेच रेल्वे प्रशासन यांच्याकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात नाहीत, असा आरोप स्थानिक करतात. त्यामुळे पाणी तुंबण्याच्या ठिकाणांवर पूर्णपणे नियंत्रण मिळवता येत नाही.