
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांमध्ये घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. परंतु महायुती सरकार त्यासाठी सक्षम नसल्याचे दिसून येत आहे. मान्सूनमुळे निवडणुका घेण्यात अडचण येऊ शकते, असे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुसळधार पाऊस असेल अशा ठिकाणच्या निवडणुका 15-20 दिवस लांबणीवर टाकाव्या लागू शकतात आणि त्यासाठी निवडणूक आयोगाकडे एक्स्टेन्शन मागितले जाईल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
पुणे येथे देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आगामी निवडणुकांबाबत भाष्य केले. निवडणुका वेळेवर होण्यासाठी कोणतीही अडचण नसल्याचा दावा त्यांनी केला; परंतु पावसामुळे काही ठिकाणच्या निवडणुकांना एक्स्टेंशन घ्यावे लागेल, असे ते म्हणाले. सरकार आणि निवडणूक आयोगाने निवडणुकांसाठी आवश्यक गोष्टींची तयारी सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिकांची प्रभाग रचना करा; निवडणूक आयोगाची राज्य सरकारला सूचना
राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारला काल एक पत्र दिले. निवडणुकांसाठी प्रभाग रचना करण्याच्या सूचना आयोगाने सरकारला दिल्या आहेत. प्रत्येक निवडणुकीपूर्वी तयारीच्या दृष्टीने तशा सूचना द्याव्या लागतात असे निवडणूक आयोगाचे अधिकारी जगदीश मोरे यांनी सांगितले.