इंफ्रामॅन आणि व्हिजनरी म्हणून मिरवणारे आता कुठे आहेत? आदित्य ठाकरे यांचा फडणवीसांना टोला

मुसळधार पावसामुळे मुंबईची दैना झाली. त्यावरून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष, महायुती सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धू धू धुतले. भाजपला मुंबईचा इतका द्वेष का, असा संतप्त सवाल करतानाच भुयारी मेट्रोही पाण्याखाली गेली असताना स्वतःला इंफ्रामॅन बोलणारे, व्हिजनरी म्हणून मिरवणारे मुख्यमंत्री आता कुठे आहेत, असा टोला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

आदित्य ठाकरे यांनी पावसामुळे बाधित झालेल्या मुंबईतील अनेक भागांची आज प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पाहणी केली. आवश्यकता आहे तिथे शिवसैनिकांना मदतकार्य करण्याच्या सूचना दिल्या. पावसाचे पाणी साचलेल्या वरळीतील भुयारी मेट्रोचीही त्यांनी पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या परिस्थितीला भाजप, मिंधे आणि महानगरपालिका जबाबदार असल्याची टीका केली.

आदित्य ठाकरे म्हणाले की, मागच्या आठवडय़ात पडलेल्या पावसात साकीनाका, अंधेरी सब-वे बंद झाला होता. तेव्हाही अनेक ठिकाणी पाणी भरले होते. वरळीतील भुयारी मेट्रोचे दोन आठवड्यांपूर्वी उद्घाटन झाले आहे. तिथे आज आत पाहायलाही जाऊ दिले जात नाही. मेट्रोने सांगितले, सांडपाणी घुसले आहे. सुरक्षा भिंत तुटली आहे. काम अजून बाकी होते असे सांगितले गेले. काम बाकी होते तर मग उद्घाटन करण्याची घाई का केली, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

कधी नव्हते तिथे पाणी साचले

गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेवर नियंत्रण ठेवणाऱया भाजप सरकारच्या पूर्ण उदासीनतेमुळे आज मुंबई ठप्प झाली आहे. मुंबईमध्ये अशा ठिकाणी पाणी साचले आहे जिथे पूर्वी कधीही पाणी साचले नव्हते. ब्रीच पँडीजवळ वॉर्डन रोडवर काँक्रिटच्या नव्या रस्त्याच्या बाजूचा अस्फाल्टचा रस्ता खचला आहे, केईएम रुग्णालयात पाणी साचले आहे, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी सरकार आणि महापालिकेच्या निष्काळजीपणाची पोलखोल केली.

हिंदमाताकडचे पंप का हलवले?

हिंदमाता चौकात पाणी साचू नये म्हणून महाविकास आघाडी सरकार असताना 2021मध्ये उपाययोजना केल्या गेल्या होत्या. त्यानंतर दोन-तीन वर्षं हिंदमाता आणि गांधी मार्पेट परिसरात पाणी साचले नाही. गेली दोन-तीन वर्षं हा परिसर पूरमुक्त होता. मग आता पुन्हा इथे पाणी कसे साचले? आता तिथे पाणी उपसायला पंपच नाहीत. पंप दुसरीकडे का नेले? मुंबईचे असे हाल का होत आहेत? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त झाले नाहीत, पण मिंध्यांच्या खिशातले खड्डे भरले

शिवसेना गेली दोन वर्षं रस्त्यांचा घोटाळा समोर आणतेय. रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी संपवा सांगत होतो. पण सरकारने फक्त थातूरमातूर उत्तरे दिली. आता सरकारचा खोटारडेपणा लोकांसमोर आला आहे. एकनाथ शिंदे खोटारडे आहेत, रस्ते खड्डेमुक्त झाले नाहीत, पण त्यांच्या खिशातले खड्डे मात्र भरले. त्यांनी मुंबईचा पैसा फक्त नगरसेवक फोडण्यासाठी वापरला आहे. ग्रीन कार्पेट घालून नालेसफाईची पाहणी केली; पण कुठल्या काँट्रक्टरला दंड लावला? कोणाला ब्लॅकलिस्ट केले? असा जोरदार हल्ला आदित्य ठाकरे यांनी चढवला. भाजप व एसंशिंनी फोडोफोडीचे राजकारण बंद करून महाराष्ट्राकडे लक्ष द्यावे, असेही आदित्य ठाकरे यांनी सुनावले.

मुंबईकरांना नुकसानभरपाई द्या

मुंबईतील नाले आणि गटारांची सफाई अर्धवट झाली आहे. त्यातून काढलेली घाण, गाळ उचलून नेण्याऐवजी बाजूलाच ठेवलेला आहे. पूरमुक्त झालेले भाग आज जलमय झाले. या निष्काळजीपणाची राज्य सरकारने चौकशी करावी. तसेच पाण्यामुळे ज्यांच्या दुकानांचे, घरांचे नुकसान झाले, त्या मुंबईकरांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.

आज मे महिन्यातच मुंबई पावसामुळे कोलमडली. दक्षिण आणि मध्य मुंबईला भाजप आणि भ्रष्ट मिंधे नियंत्रित पालिकेच्या कारभाराचा फटका बसला. नेपियन्सी रोड, महापालिकेची वॉर्ड ऑफिसेस आणि मंत्रालयाजवळसुद्धा पाणी साचले. रस्ते घोटाळ्याचे हे परिणाम आहेत आणि शिवसेनेने वारंवार आवाज उठवूनही भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने त्याची दखल घेतलेली नाही. भाजपला मुंबई का संपवायची आहे, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

भाजपची केंद्रात, राज्यात मागच्या दहा वर्षांपासून सत्ता आहे. सर्व यंत्रणा सीएम ऑफिस आणि नगरविकास खात्यातून चालतात. त्या किती निकम्म्या आणि भ्रष्ट आहेत ते आज दिसतेय. मुंबईकर अशा भाजपवर विश्वास ठेवू शकत नाहीत.

पत्रकारांना बंदी

आचार्य अत्रे चौक भुयारी मेट्रो स्थानकात पाणी भरल्याचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकार आणि छायाचित्रकारांना रोखण्यात आले. सुरक्षा रक्षकांनी स्थानकातून सर्व माध्यमांना हुसकावले. काही प्रतिनिधींना धक्काबुक्कीही करण्यात आली. वार्तांकन करण्यास बंदी घालण्यात आली. माध्यमांना बाहेर काढल्यानंतर स्थानकाचे शटर लॉक करण्यात आले.