
मुंबईत बेफाम पडलेल्या पहिल्याच पावसात पालिकेच्या केईएम रुग्णालयात पाणी शिरल्याची गंभीर दखल घेत हायकोर्टाने आज रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला. केईएम हे हिंदुस्थानातील सर्वोत्तम रुग्णालयांपैकी एक आहे. देशभरातून रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येत असतात. त्याची अशी अवस्था होता कामा नये. स्वच्छता आणि नीटनेटकेपणा राखण्यासाठी काहीतरी केले पाहिजे असे बजावत न्यायालयाने याप्रकरणी पालिकेला नोटीस बजावली तसेच प्रतिज्ञापत्रावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
2023 साली नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये झालेल्या रुग्णांच्या मृत्यूंबाबत स्युमोटो याचिका दाखल करून घेतली असून या याचिकेवर आज गुरुवारी सुट्टीकालीन खंडपीठाच्या न्यायमूर्ती गौरी गोडसे आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसेन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने नेमलेल्या अमायकस क्युरी (न्यायालयीन मित्र) मोहित खन्ना यांनी माहिती देताना खंडपीठाला सांगितले की, नुकत्याच झालेल्या पावसात केईएम रुग्णालयात पाणी साचले होते. त्यात रुग्ण उपचारासाठी ताटकळत वाट पाहत होते. न्यायालयाने याची गंभीर दखल घेत प्रशासनाला जाब विचारला व कानउघाडणी केली.
रुग्णालयाला भेट द्या
न्यायालयाने पालिकेला याप्रकरणी नोटीस बजावली आणि अधिकाऱ्यांना रुग्णालयाला भेट देऊन तक्रारींचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना सुचविण्यास सांगितले. त्यासंदर्भात न्यायालयात पालिका व राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास बजावले व सुनावणी 16 जून रोजी ठेवली.
सरकारचे म्हणणे काय?
न्यायालयात उपस्थित असलेल्या केईएम रुग्णालयाच्या सहाय्यक डीनच्या सूचनांनुसार अतिरिक्त सरकारी वकील प्रियभूषण काकडे यांनी खंडपीठाला सांगितले की, याअगोदर पुराच्या पाण्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली नाही व भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. तसेच यापुढे अशा घटना टाळण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने करावयाच्या प्रस्तावित कारवाईची नोंद रेकॉर्डवर ठेवली जाईल.