तूर्तास कारवाई नाही! शशी थरूर यांच्या स्पष्टीकरणानंतर काँग्रेसची तलवार म्यान, नेमकं प्रकरण काय?

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. त्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’चा संदेश जगात पोहचविण्यासाठी केंद्र सरकारने 7 शिष्टमंडळ तयार केले. हे शिष्टमंडळांनी अनेक देशांना भेट देऊन दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानचा पर्दाफाश केला. काँग्रेस नेते शशी थरूर हे देखील या शिष्टमंडळाचा भाग असून विदेशात हिंदुस्थानची बाजू भक्कमपणे मांडताना ते दिसले. मात्र यादरम्यान त्यांनी केलेल्या काही विधानांमुळे काँग्रेसमध्ये नाराजी पसरली होती. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची शक्यता होती. परंतु शशी थरूर यांनी एक्सवर (आधीचे ट्विटर) स्पष्टीकरण दिल्यानंतर काँग्रेसने तलवार म्यान केली आहे. थरूर यांच्या ऑपरेशन सिंदूरवरील विधानांबाबत सध्या तरी कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.

हे वाचा – काँग्रेसमध्ये असणे आणि काँग्रेसचे असणे यात खूप फरक आहे; नाव न घेता जयराम रमेश यांचा शशी थरूर यांच्यावर निशाणा

हिंदुस्थानने जगभरामध्ये पाठवलेल्या 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळापैकी एका शिष्टमंडळाचे नेतृत्व काँग्रेस खासदार शशी थरूर करत आहेत. पाकिस्तानवर पहिला सर्जिकल स्ट्राईक भाजपच्या काळात 2016 मध्ये झाल्याचे विधान त्यांनी पनामा येथे केले. यामुळे काँग्रेसमधून नाराजीचा सूर उमटला.

थरूर हे भाजपचे सुपर प्रवक्ते असून ते मोदींची प्रसंशा करण्याच्या बाबतीत आघाडीवर असल्याची टीका काँग्रेस नेते उदित राज यांनी केली. तसेच काँग्रेस नेते पवन खेरा आणि जयराम रमेश यांनीही त्यांच्यावर टीका करत हिंदुस्थानने यापूर्वीही पाकिस्तानवर हल्ला केल्याची आठवण करून दिली. तर 1971 मध्ये तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे करत ‘न भूतो न भविष्यती’ कामगिरी करताना घरात घुसून मारले होते, अशी आठवण काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी करुन दिली एकीकडे राजकीय वातावरण तापात असतानाच थरूर यांनी एक्सवर एक पोस्ट करत स्पष्टीकरण दिले.

पनामातील दीर्घ आणि यशस्वी दिवसानंतर शशी थरूर यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले की, माझ्याकडे अधिक वेळ नाही, पण नियंत्रण रेषेवर हिंदुस्थानी जवानांनी गाजवलेल्या शौर्याबद्दल माझ्या कथित अज्ञानाबाबत बोलणाऱ्या कट्टरथपंथीयांसाठी मला वेळ काढावा लागेल. मी स्पष्टपणे फक्त दहशतवादी हल्ल्यांना दिलेल्या प्रत्युत्तराबद्दल बोलत होतो, ना की मागील युद्धांबाबत आणि यात अलिकडच्या काळात झालेल्या अनेक हल्ल्यांचा संदर्भ होता. पण नेहमीप्रमाणे, टीकाकार आणि ट्रोलर्स माझे विचार, शब्द विकृत करू शकतात, पण माझ्याकडे करण्यासाठी आणखीही काही चांगल्या गोष्टी आहेत.