ऐन पावसाळ्यात मुंबईवर पाणीटंचाईचे सावट, पावसाची तलाव क्षेत्राकडे पाठ

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाच्याही 15 दिवस आधी दाखल झालेल्या पावसाने मुंबईसह राज्यात सर्वदूर हजेरी लावली. मात्र, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सात तलाव क्षेत्रांकडे पाठ फिरवल्याने मुंबईचा पाणीसाठा आटत चालला आहे. मुंबईच्या तलावांमध्ये सध्या 1 लाख 91 हजार 942 दशलक्ष लिटर म्हणजे केवळ 13 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे येत्या काळात दमदार पाऊस पडला नाही तर मुंबईवर पाणीकपातीचे संकट येऊ शकते.

मुंबईला मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज 3 हजार 950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत साधारणपणे 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. ऑक्टोबरमध्ये सातही तलावांमधील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पाणीसाठा जाहीर केला जातो.

2 जून रोजी पाणीसाठा

(दशलक्ष लिटर)

अप्पर वैतरणा 16,020
मोडकसागर 40,739
तानसा 18,204
मध्य वैतरणा 27,327
भातसा 78,180
विहार 8,944
तुळशी 2,527

…तर पाणीकपातीचा निर्णय

राज्य सरकारने मुंबईला 2 लाख 30 हजार 500 दशलक्ष लिटर राखीव साठा तत्त्वतः उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे ज्यावेळी पाणीसाठा अगदीच कमी होईल त्यावेळी राज्य सरकारच्या भातसा आणि अप्पर वैतरणा तलावांमधून हा साठा घेण्यात येईल. हा राखीव साठा घेतला तर मुंबईकरांना जुलै अखेरपर्यंत पाण्याची आवश्यकता भासणार नाही. गेल्या वर्षी पाणीसाठा 10 टक्क्यांवर पोहोचल्यावर पाणीकपात जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे तलाव क्षेत्रांत पाऊस पडला नाही तर पाणीकपातीचा निर्णय घेतला जाऊ शकतो.