सिक्कीममध्ये लष्कराच्या छावणीवर भूस्खलन, तीन जवानांचा मृत्यू; नऊ बेपत्ता

उत्तर सिक्कीमच्या चाटेन भागात रविवारी मध्यरात्री लष्करी छावणीवर भूस्खलन झाले. त्यात 3 जवानांचा मृत्यू झाला, तर 9 जवान बेपत्ता आहेत. सोमवारी रात्री उशिरापर्यंत त्यांचा थांगपत्ता लागला नाही. मुसळधार पावसामुळे लाचेन नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. त्यात भूस्खलनाची दुर्घटना घडली.

चाटेनमधील भूस्खलनामुळे अनेक भागांचे नुकसान झाले आहे. या घटनेत जवानांसह अनेक स्थानिक लोक बेपत्ता आहेत. त्यांचा शोध आणि ओळख पटवण्याचे काम अजूनही सुरू आहे. बेपत्ता जवान आणि नागरिकांचा शोध घेण्यासाठी सतत शोध मोहीम राबवली जात असल्याचे चुंगथांग उपविभागीय पोलीस अधिकारी थाटल यांनी सांगितले. चाटेन भाग हा लाचेन नदीपासून जवळपास 3 किलोमीटर अंतरावर आहे. या भागात लष्कराच्या अनेक छावण्या असून परिसरात वारंवार भूस्खलनाच्या घटना घडत आहेत.

ईशान्य हिंदुस्थानात पुराचा कहर कायम; बळींची संख्या 34वर

ईशान्य हिंदुस्थानात मुसळधार पाऊस तसेच पुराचा कहर कायम आहे. सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालॅंड, मेघालय आणि त्रिपुरामध्ये पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. त्यातील बळींची संख्या सोमवारी 34वर पोहोचली. आसाममध्ये मागील 48 तासांत पुरात तीन जणांनी प्राण गमावले, तर गुवाहाटीच्या विविध भागांत झालेल्या भूस्खलनामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला. आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या राज्य सरकारांच्या विनंतीवरून हिंदुस्थानी हवाई दलाने हेलिकॉप्टरच्या साहाय्याने बचाव मोहीम सुरू ठेवली आहे.

1600 पर्यटकांची सुटका

सोमवारी सकाळी लाचुंगमध्ये अडकलेल्या सुमारे 1600 पर्यटकांना वाचवण्यात आले. यात 380 मुलांचा समावेश आहे. हे लोक 30 मेपासून या भागात अडकले होते. मुसळधार पावसामुळे सिक्कीमच्या अनेक भागांतील रस्ते बंद झाले होते.