
श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला येणार्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या भाविकांना सुलभ व जलद दर्शन मिळणे गरजेचे आहे. मात्र, मंदिर समितीकडून तुळशीपूजा व इतर पुजांचा घाट घातला जात आहे. त्यामुळे तासनतास भाविकांना दर्शन रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे भाविकांच्या भावनांचा उद्रेक होत आहे. हे होऊ नये, भाविकांना जलद दर्शन मिळावे, याकरीता तुळजीपूजा बंद कराव्यात, अशी मागणी वारकरी संप्रदाय पाईक संघाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
थेट व्हीआयपी सोडायला अडचण होते, मंदिर अधिनियम कायद्यानुसार दर्शनाला पैसे घेता येत नाही, म्हणून मंदिर समितीच्या अधिकार्यांनी 2100 रुपयांत 5 भाविक सोडणारी तुळशी पुजा नावाची ’पेड’ दर्शन व्यवस्था चालू केली आहे. दिवसातून साधारण चार वेळा प्रत्येक वेळी दहा ते बारा पुजा सोडल्या जातात. एकूण 60 पूजा दिवसभरात होतात. यात प्रत्येकी पाच या नुसार दिवसभरात तीनशेहून अधिक भाविक थेट सोडले जातात.
या प्रत्येक पाच जणांना श्री विठ्ठल रुक्मिणी मुर्ती जवळ हार, पेढे दाखवून अगदी निवांतपणे दर्शन दिले जाते. हे सगळे होत असताना सामान्य भाविक दर्शनासाठी व्याकूळ होऊन तहान, भूक हरपून ताटकळत तासनतास उभा असतो. याच्याकडे कोणाचेही लक्ष नाही. म्हणून तुळशीपुजेलासाठी लागणारा वेळ वाचेल, आणि भाविकांना जलद दर्शन घेता येंईल, याकरीता तुळशीपुजा बंद करावी, अशी मागणी केली जात आहे. याबाबत मंदिर समिती काय निर्णय घेते, याकडे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
तुळशी पुजांमुळे दिवसभरात किमान दोन तास दर्शनासाठी उभारलेल्या भाविकांच्या हक्काच्या वेळेतून घेतले जातात. व्हिआयपीच्या नावाखाली सोडले जाणारे लोक वेगळेच. त्यामुळेच तासनतास दर्शन बारी जागेवरुन हलत नाही. त्यामुळे भाविकांचे अतोनात हाल होत आहेत. याचाच उद्रेक दोन दिवसापुर्वी झाला. संपुर्ण दर्शन रांगेतील भाविकांनी नाराजी व्यक्त केली.
“ही सर्व परिस्थिती तात्काळ बदलण्यासाठी ही तुळशी पुजा बंद केली पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.”
– रामकृष्ण महाराज वीर, राष्ट्रीय प्रवक्ता, वारकरी संप्रदाय पाईक संघ.