
‘मुंबई मेट्रो वन’ अर्थात घाटकोपर-वर्सोवा मेट्रो मार्गावर मुंबईकरांच्या सेवेत धावणाऱ्या मेट्रोला दिवसेंदिवस मुंबईकरांचा वाढता प्रतिसाद लाभत आहे. ही मेट्रो उद्या रविवार, 8 जूनला 11 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. गेल्या 11 वर्षांच्या कालावधीत तब्बल 1.1 अब्ज म्हणजेच 111 कोटी प्रवाशांनी ‘मेट्रो वन’मधून आरामदायी प्रवास केला. 11 वर्षांपूर्वी म्हणजेच 8 जून 2014 रोजी या मेट्रोची सेवा सुरू झाली होती.
सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) अंतर्गत देशातील पहिला मेट्रो प्रकल्प म्हणून वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गिका कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक सेवेचे प्रतीक म्हणून नावारूपाला आली आहे. आर्थिक राजधानी मुंबईत प्रवासी सेवेत दाखल झालेली ही पहिली मेट्रो सेवा आहे. या मार्गावर 11 वर्षांत मेट्रोने तब्बल 12.6 लाखांहून अधिक फेऱ्या आणि 1.45 कोटी किलोमीटर प्रवास केला. वक्तशीरपणामध्येही मेट्रोने आघाडी राखला आहे. मेट्रो वनचा वक्तशीरपणाचा दर 99.99 टक्के आहे. मुंबई मेट्रो वनची इतर मेट्रो मार्गांसोबत कनेक्टिव्हीटी असल्यामुळे शहरातील प्रवासाचा वेळ कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असा दावा मेट्रो वनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला.
घाटकोपर स्थानकात सर्वाधिक 30 कोटी प्रवासी
मेट्रो वन मार्गावर एकूण 12 स्थानके असून त्यापैकी घाटकोपर स्थानकात सुमारे 30 कोटी प्रवाशांनी ये-जा केली. त्यामुळे हे स्थानक सर्व स्थानकांमध्ये अव्वल स्थानक ठरले आहे. त्यापाठोपाठ अंधेरी स्थानकात 23 कोटी आणि साकीनाका स्थानकात 11 कोटी प्रवाशांची वर्दळ राहिली आहे. या मार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सरासरी संख्या सुमारे पाच लाखांच्या घरात आहे.