ओडिशात शाळांत कोविड प्रोटोकॉल लागू; देशभरातील आकडा साडेपाच हजारांवर, गुजरातेत 24 तासांत रुग्णांची शंभरी

राजधानी दिल्लीत कोरोनाचा शिरकाव झाला असून, पाच वर्षांच्या चिमुकल्याला जीव गमवावा लागला. यानंतर ओडिशात उन्हाळी सुट्टीनंतर शाळा सुरू झाल्या असून, पहिल्या दिवसापासून कोविड प्रोटोकॉल लागू करण्यात आला.

शिक्षण मंत्री नित्यानंद गोंड म्हणाले की, ज्या मुलांना सर्दी, खोकला किंवा ताप अशी सौम्य लक्षणे आहेत त्यांनी शाळेत मास्क घालणे बंधनकारक आहे. गंभीर लक्षणे असलेल्या मुलांना घरीच राहण्याचा आणि स्वत:ला वेगळे करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील आठवडय़ापासून अनेक राज्यांतील शाळांना कोविडची मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याची शक्यता आहे.

देशात 24 तासांत 500 नवीन रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत केरळमध्ये  1679 रुग्ण तर गुजरातमध्ये 24 तासांत 102 नव्या रुग्णांसह आतापर्यंत 615 सक्रिय रुग्ण आहेत. देशात कोरोनाचे रुग्ण झपाटय़ाने वाढत असताना धक्कादायक बाब समोर आली आहे. 20 दिवसांत रुग्णांची संख्या 58 पटीने वाढली आहे. 16 मे रोजी देशभरात कोविडचे 93 सक्रिय रुग्ण होते, ज्यांची संख्या आता  5700 वर पोहोचली आहे. 24 तासांत पाच मृत्यूनंतर देशातील मृतांचा आकडा 59 वर पोहचला आहे.

कोरोनाला घाबरू नका, चिंतेची गरज नाही – तज्ञ

जगभरात कोरोना महामारीने पुन्हा एन्ट्री केल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मात्र, या नव्या व्हेरिएंटची तीव्रता गंभीर नसल्याचे तज्ञ सांगत आहेत. आरोग्याचे अभ्यासक डॉ. चंद्रकांत लहरिया म्हणाले की, आता सर्दी, खोकला आणि ताप हे ऋतुमानाप्रमाणे होणारे आजार आहेत. श्वसन विकार आणि व्हायरलइतके कोरोना विषाणू गंभीर नसून, कोरोनाला घाबरू नका, चिंतेची अजिबात गरज नाही. लक्षणे वाटल्यास औषधोपचार करण्याचे त्यांनी सांगितले.