
आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. त्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने 5200 विशेष गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रुप बुकिंग केल्यास गावातून थेट पंढरपूर अशी सेवाही दिली जाणार आहे.
राज्यातील कोणत्याही गावातून 40 अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविकांना आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा लागणार आहे. या प्रवासातदेखील 75 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’, महिलांसाठी 50 टक्के तिकीट दरात सूट देणारी ‘महिला सन्मान योजना’ यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत. गतवर्षी एसटीने आषाढी यात्रेनिमित्त पाच हजार विशेष बसेस सोडल्या होत्या. 21 लाख प्रवाशांनी त्याचा लाभ घेतला होता. यात्राकाळात पंढरपूर येथे प्रवाशांच्या सोयीसाठी चंद्रभागा, भीमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती स्थानके उभारण्याचा निर्णयही एसटी महामंडळाने घेतला आहे.