
>> संजीव साबडे
कोणत्याही शहरातील वा गावातील प्रत्येकजण कधी ना कधी हॉटेल म्हणजे रेस्टॉरंटमध्ये गेलेला असतोच. कधीही रेस्टॉरंटमध्ये न गेलेला माणूस आपल्याला बहुधा शोधूनही सापडणार नाही. मुंबईतील लोक तर रेस्टॉरंटमध्ये जातातच जातात. काही नाइलाज म्हणून बाहेर जेवतात, तर काही कधी तरी कुटुंबासह रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातात. काहींच्या मित्रमंडळींसह रेस्टॉरंटमध्ये पार्ट्या असतात. काहीजण रस्त्यावर उभं राहून वडापाव, डोसा, पाणीपुरी, पावभाजी, मोमोज, सँडविच, फ्रँकी वा आइक्रिमचा आस्वाद घेतात. कुठे खायचं, काय खायचं हे आपला खिसाच प्रामुख्याने ठरवतो.
पण कधी तरी अमुक एके ठिकाणी एकदा तरी जायचंय असं प्रत्येकजण मनात ठरवतो वा बोलून दाखवतो. ताज, ओबेरॉय, आयटीसी, लीला, हिल्टन, रॅडिसन अशा मोठ्या हॉटेलातील रेस्टॉरंटमध्ये कधी तरी नक्की जाऊ, असं त्याचं स्वप्न असतं. पण त्याहूनही मुंबईत अशी काही रेस्टॉरंट्स आहेत की जिथे एकदा तरी नक्की जावं. स्टार हॉटेलपेक्षा ही रेस्टॉरंट उत्तम व खूप स्वस्त आहेत. मुख्य म्हणजे त्यांना स्वतचा इतिहास आहे. त्यांनी 100-150 वर्षं मुंबईत आपलं अस्तित्व आणि महत्त्व टिकवून ठेवलं आहे.
कुलाब्याच्या एका रेस्टॉरंटने तर 26 नोव्हेंबर 2006 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याला तोंड दिलं आहे. त्या हल्ल्यात रेस्टॉरंटमध्ये बसलेले दहाजण मरण पावले होते. ते होऊनही ताठ मानेने उभं आहे हे कॅफे लिओपोल्ड. या 1871 साली सुरू झालेल्या मुंबईतील पहिल्या इराणी रेस्टॉरंटला 154 वर्षं झाली आहेत. अन्य इराणी रेस्टॉरंटच्या तुलनेत कॅफे लिओपोल्ड बऱ्यापैकी महाग. पण खाद्यपदार्थ अप्रतिम आणि ठिकाणही शांत. त्यामुळे तिथे परदेशी पर्यटकांची अधिक गर्दी असते. तिथेच जवळ कॅफे मॉन्डेगर आहे. त्या रेस्टॉरंटला पाच वर्षांनी 100 वर्षं पूर्ण होतील. आणखी एक जुनं म्हणजे मेट्रो सिनेमाजवळची कयानी अँड कंपनी. हे लोकप्रिय रेस्टॉरंट यंदा 121 वर्षांचं झालं आहे. सर्वांना परवडेल, अशा या ठिकाणी केक, बन मस्का, इराणी चाय, कॅरमल कस्टर्ड आणि सर्व बेकरी पदार्थ मिळतात. इथला ऑम्लेट पाव आणि खिमा पावही प्रसिद्ध आहे.
ग्रॅण्ट रोड स्टेशनसमोरच्या बी. मेरवानलाही यंदा 111 वर्षं झाली. हेही ठिकाण अतिशय मस्त व परवडणारं. तिथले मावा केक प्रसिद्ध व लोकप्रिय. रोज तिथले 7000 केक संपतात. तिथे गेलात तर रेस्टॉरंटसमोर नक्की फोटो काढा. इतक्या जुन्या व खानदानी ठिकाणाला भेट दिल्याचा पुरावा. याखेरीज फोर्टमधील कॅफे मिलिटरी, कूलर अँड कंपनी 100 वर्षांकडे पोहोचत आहे, तर कॅफे एक्सेलसिअर 106 वर्षांचं झालं आहे. दादरला हिंदू कॉलनीच्या तोंडावर असलेलं कॉलनी रेस्टॉरंटही 100 च्या घरात आहे. मेट्रोहून मरिन लाइन्सकडे येताना गोल मशिदीपाशी ससानियान नावाचं पारशी खाद्यपदार्थ देणारं रेस्टॉरंट सुरू झालं 1013 साली. म्हणजे 112 वर्षांपूर्वी आणि हॉर्निमन सर्कलमधलं जिमी बॉयने यंदा शंभरी पार केली आहे.
कॅफे लिओपोल्ड 1871 साली सुरू झालं होतं. पण त्याच्या 23 वर्षं आधी 1848 साली एक ठिकाण सुरू झालं. मुंबईत रेल्वे स्टेशन आणि रेल्वे सुरू होण्याआधी. तेव्हा व्हिक्टोरिया टर्मिनसही नव्हतं आणि मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे धावलीही नव्हती. सात बेटांची मिळून मुंबई झाली होती, पण साष्टी बेट आणि मुंबई एकमेकांना जोडलं गेलं नव्हतं. अशा काळात आगऱ्याहून पंचम शर्मा नावाचा माणूस बैलगाडी हाकत मुंबईत आला. त्याला इथे यावं असं का वाटलं कोणास ठाऊक, पण तेव्हाही देशभर मुंबईचं नाव झालं असणार आणि तिची महतीही कळली असणार. या पंचम शर्माने तेव्हाच्या बोरा बाजारात, आताच्या पेरीन नरिमन स्ट्रीटवर उत्तर भारतीय पद्धतीची पुरी-भाजी विकायला सुरुवात केली. लोक या पुरी-भाजीच्या प्रेमातच पडले आणि त्यातून पुढे रेस्टॉरंट सुरू झालं पंचम पुरीवाला. पूर्वी हे ठिकाण बरंच अस्वच्छ व कळकट होतं. पण पुरी-भाजी स्वस्त होती आणि मस्तही. पुढच्या पिढीने ते चकचकीत व स्वच्छ आणि लोकांनी तिथे येऊन खावं असं केलं आहे. आता तिथे पूर्ण जेवणही टिपिकल उत्तर भारतीय पद्धतीचं मिळतं.
इराणी व पारशी मंडळींनी मुंबईत रेस्टॉरंट व्यवसाय सुरू केला आणि मुंबईतील या व्यवसायाचे जनक होते पंचम शर्मा. पण ही सारी रेस्टॉरंट फोर्ट व मरिन लाइन्स परिसरात होती. पहिलं मराठी माणसाचं रेस्टॉरंट सुरू झालं दादरमध्ये, स्टेशनसमोर. ते म्हणजे मामा काणे! नारायण विष्णू काणे यांनी 10 फेब्रुवारी 1910 रोजी म्हणे 115 वर्षांपूर्वी हे सुरू केलं. तेव्हा त्याचं नाव होतं दक्षिणी ब्राह्मणाचे स्वच्छ उपाहार गृह. साधं रेस्टॉरंट आणि चांगले खाद्यपदार्थ व जेवण हे त्यांचं वैशिष्ट्य. ते कऱ्हाडे ब्राह्मण. गिरगावात नंतर कऱ्हाडे ब्राह्मणांची अनेक रेस्टॉरंट सुरू झाली. तांबे, केळकर, वीरकर, पणशीकर, टेंबे, जोगळेकर, चाफेकर वगैरे. त्यात पुढाकार होता तांबे यांचा. त्यांची पाचही रेस्टॉरंट्स बंद पडली. पणशीकर आहार (पूर्वी मिल्क बार) मात्र 104 वर्षांपासून सुरू आहे. भडकमकर मार्गावर नाझ सिनेमापाशी असलेलं चाफेकर हॉटेल (पूर्वीचं दुग्ध मंदिर) तीन वर्षांनी शंभर वर्षांचं होईल. मराठी वस्ती कमी होत असूनही मालकांनी ही रेस्टॉरंट बंद पडू दिलेली नाहीत. तांबे यांचं बोरीबंदरचं ‘आराम’ गेली 86 वर्षं रोज गर्दी खेचत आहे. मराठी रेस्टॉरंटचं वैशिष्ट्य म्हणजे खाद्यपदार्थांचा उत्तम दर्जा.
यात आणखी एका रेस्टॉरंट म्हणजे ‘शेर ए पंजाब.’ ते आता 94 वर्षांचं आहे. मुंबईतलं हे पहिलं पंजाबी खाद्यपदार्थ आणि तंदुरी पदार्थ व कबाब देणारं ठिकाण आजही लोकप्रिय आहे. त्याचा दबदबा व तिथली चव कायम आहे.