सिनेविश्व – पडद्यावरच्या स्थळांचे पर्यटकांना आकर्षण

>> दिलीप ठाकूर

आपल्या देशातील चित्रपट प्रेक्षक अतिशय भन्नाट व जगावेगळे. ते आवडलेला चित्रपट पडद्यावरच ठेवून बाहेर पडत नाहीत. ते त्यांच्या मनात, हृदयात, मेंदूत राहतात आणि त्याचा ते कुठे, कसा, सकारात्मक प्रत्यय देतील हे त्यांचे त्यांनाच ठाऊक! कोणी एखादा प्रसंग लक्षात ठेवतो, कोणी संवाद तर कोणी चित्रीकरण स्थळ. कोल्हापुरातील गगनबावडा येथे फिरायला गेल्यावर अनेकजण पंत अमात्य बावडेकर वाड्याला आवर्जून भेट देतात. का, तर ‘पछाडलेला’ या चित्रपटात हा वाडा पाहिला होता. तसे तर इतरही काही चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले, पण ‘पछाडलेला’मध्ये त्याचे अस्तित्व जास्त जाणवते. परशुरामपंत अमात्य यांनी 1935 साली बांधलेल्या या वाडय़ाच्या आसपास जंगल आहे. त्यामुळेच भयदृश्यात त्याचा उपयोग होतो. ‘रात्रीस खेळ चाले’ या भयमालिकेचं चित्रीकरण झालेल्या कोकणातील घराला अनेक पर्यटक आवर्जून भेट देतात. त्यासह फोटो वा सेल्फी काढतात.

चित्रपटात पाहिलेल्या स्थळांना प्रत्यक्षात महत्त्व येणे हे केव्हापासून सुरू आहे. ‘आराधना’चे ‘मेरे सपनों की रानी कब आयेगी तू…’ गाणे लोकप्रिय होताच दार्जिलिंगला गेलेल्या प्रत्येक पर्यटकास तेथील रेल्वेत बसावेसे वाटले. ‘बॉबी’चे उदाहरण अतिशय उत्तम. श्रीनगरमधील ज्या बंगल्यात ऋषी कपूर व डिंपल शिरतात आणि मग त्यांच्या मोकळ्याढाकळ्या प्रणयात ‘हम तुम एक कमरे मे बंद हो’ हे गाणे सुरू होते. ते घर कायमच

‘बॉबी’तलं घर म्हणून दाखवले जाते. आणखीही अनेक चित्रपटांत पहलगामचे हिरवेगार सौंदर्य दिसते. पण जेव्हा पर्यटकांना येथे ‘बॉबी’चा संदर्भ देईपर्यंत चित्रपट रसिक मात्र ‘बॉबी’, ‘आप की कसम’, ‘जिंदादिल’ अशा इतर चित्रपटात पहलगामचे निसर्गसौंदर्य आपण पाहिले याचे संदर्भ देतात. ‘बेताब’चे चित्रीकरण झालेली कश्मीरमधील व्हॅली तेव्हापासून म्हणजेच तब्बल चाळीस वर्षांपासून ‘बेताब व्हॅली’ म्हणून ओळखली जाते. ‘1942- अ लव्ह स्टोरी’मधील हिमाचल प्रदेशातील डलहौसीतील प्रत्येक स्पॉटचे पर्यटकांचे आकर्षण वाढवणारे. देशविदेशात पर्यटनास जायचे ठरवल्यावर तेथे कोणत्या चित्रपटाचे शूटिंग झालेय हे आज गुगल सर्चने समजू शकते. अनेक वर्षे मात्र ते आवडीनुसार लक्षात राहायचे. त्यातल्या जिव्हाळ्यात जास्त आनंद मिळे. आज मुंबईतील वांद्रय़ाचा बॅण्ड स्टॅन्ड परिसर फार गजबजलेला असतो. 50-55 वर्षांपूर्वी मात्र तेथे बराच शुकशुकाट असे. त्यातही कोणी तेथे फिरायला गेल्यावर त्याला ‘बुढ्ढा मिल गया’ या चित्रपटातील ‘रात कली एक ख्वाब मे आयी’ हमखास आठवायचे. ‘एक दुजे के लिए’पासून गोव्यातील प्रसन्न, दिलखुलास अशा समुद्र किनाऱ्यावरील वाळूत शिंपले शोधणे, दगडावर आपलेही नाव कोरण्याची क्रेझ निर्माण झाली. जे पडद्यावर तेच प्रत्यक्षात असेच हे समीकरण.

‘लोकल ते ग्लोबल’ असा हा चित्रपटातील लोकेशन व चाहत्यांचे त्याच्याशी जमलेले नाते असा हा प्रवास आहे. दिग्दर्शक यश चोप्रा यांनी स्वित्झर्लंडला सातत्याने आपल्या चित्रपटातील प्रणय प्रसंग, प्रणयगीतांचे चित्रीकरण केल्याने स्वित्झर्लंडमधील इंटरलाकेन परिसरात त्यांचा पुतळा बसवला. एका रस्त्याला त्यांचे नाव दिले. त्यांच्या नावाने एक ट्रेनदेखील तेथे आहे. युरोप पर्यटनात हे सगळेच अनुभवता येते. पूर्वीच्या पर्यटकांना लंडनला गेल्यावर राज कपूर दिग्दर्शित ‘संगम’मधील अनेक स्पॉट दिसत नि त्यात त्यांना आनंद मिळे. अशी आणखी अनेक उदाहरणे आहेत. देशविदेशातील अनेक पर्यटनस्थळांचे महत्त्व चित्रपटातील त्यांच्या दर्शनाने वाढवले. पिक्चर हिट तर अशी स्थळेही लोकप्रिय.

अमिताभ बच्चनच्या ‘अग्निपथ’ने मांडवा गाव लोकप्रिय केले, पण यातले मांडवा गाव हे अलिबाग तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावरील मांडवा नाही. ते ‘दो जासूस’, ‘इन्साफ’ चित्रपटात दिसले. ‘अग्निपथ’मध्ये (त्याच्या रिमेकमध्येही) मांडवा गाव एक व्यक्तिरेखा आहे. प्रत्यक्षात शूटिंग इतरत्र केलेय. आपला चित्रपट रसिक पडद्यावर बरेच काही पाहतो आणि त्यात त्याला दिसलेली अनेक स्थळे त्याला भटकंतीच्या वेळेस पाहावीशी वाटतात हीच तर गंमत आहे.

[email protected]

(लेखक सिनेपत्रकार व समीक्षक आहेत)