प्रासंगिक – तणावमुक्तीवर योगाची साधना

>> योगिनी कानडे

योग हा पूर्ण जगाला भारतीय परंपरेने दिलेला अमूल्य ठेवा आहे. 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यास मान्यता मिळाली आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःच्या स्वास्थ्यासाठी लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठी दररोज किमान व्यायाम प्रकार करून स्वतःचे स्वास्थ्य व आरोग्य उत्तम राखण्यासाठी योगाशिवाय पर्याय नाही. इतकंच नाही तर तणावमुक्ती साधायची असेल तर योगसाधना करायला हवी.

लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाला आपल्या शारीरिक कुवतीप्रमाणे करता येतील अशी वेगवेगळी आसनं करून स्वतःचे स्वास्थ्य व आरोग्य उत्तम राखता येईल हे लक्षात घेऊन आम्ही आमच्या शाळेत म्हणजेच डी.ई.एस. प्रायमरी विभागामध्ये गेली तीन वर्षे सातत्याने योगा हा उपक्रम राबवत आहोत.

आज आवर्जून सांगावेसे वाटते सूर्यनमस्कार हा माझा जिव्हाळय़ाचा विषय. सूर्यनमस्कार ही प्राचीन उपासना व व्यायाम पद्धती आहे. दररोज सूर्यनमस्कार घातल्याने आपल्या सर्वांगीण शरीराचा विकास होऊन आपल्याला सुदृढ आरोग्य लाभते. आपण सूर्यनमस्कार दहा अंकात घातले तर त्याचा फायदा आपल्याला निश्चितच होणार आहे. सूर्यनमस्काराच्या सरावामुळे पचनशक्ती सुधारते, अपचन, आम्लपित्त, वात, बद्धकोष्ठता याचे त्रास कमी होतात, आपल्या शरीरातील लवचिकता वाढवून रक्त प्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे स्टॅमिना वाढतो. थायरॉईड व महिलांचे जे त्रास आहेत यावर सूर्यनमस्कार अत्यंत उपयोगी आहेत. सूर्यनमस्कार किंवा कोणतीही योगासने घाई गडबडीत करू नयेत ती शांतपणे करावीत. श्वसनावर लक्ष केंद्रित करावे, पूरक, रेचक, कुंभक या श्वसनांचा व्यवस्थित वापर करावा म्हणजे आपल्याला आपली स्वतःची काळजी घेऊन आपल्या शरीरावर आपण उत्तम काम करू शकतो. आपल्याकडे आपल्या आजीच्या बटव्यामध्ये आपण हे अनुभवलेला आहे. लहानपणी केलेले संस्कार मोठेपणी कामी येतात व चिरकाल टिकतात. त्यामुळे आम्ही आमच्या डीएस शाळेमध्ये योगाभ्यास हा लहान वयातच सुरू केलेला आहे. योगाभ्यास हा मानवी जीवन घडवत असताना अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आपल्याला प्रत्येक क्षेत्रात उच्च स्थानी जायचे असेल तर योगाभ्यास हा अत्यंत महत्त्वाचा व अविभाज्य घटक मानला जातो असे मला वाटते. कारण मी स्वतः याचा अनुभव घेत आहे. एक क्रीडा शिक्षिका म्हणून मला असे वाटते पुढील पिढी कणखर होण्यासाठी योगशिक्षणाचे अत्यंत महत्त्व आहे. बालवयापासून योग शिक्षणाचा आरंभ केला तर मनाचा पाठीचा आणि राष्ट्राचा कणा मजबूत होईल यात तीळ मात्र शंका नाही. कारण व्यक्तीची उन्नती हीच समाजाची पर्यायाने राष्ट्राची उन्नती आहे. योग शिक्षणाचे महत्त्व हे आपल्याला या ठिकाणी हेच शिकवते स्वतः सुदृढ व पर्यायाने आपला देश सुदृढ करा. योग अभ्यासामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह तर वाढतोच, चपळता वाढते, त्यांची खेळण्याची आवड वाढते, त्यांना खेळामध्ये गती येते. या गोष्टी मला एक क्रीडा शिक्षिका म्हणून अनुभवायला मिळतात. अभ्यास करताना विचार केला तर क्रमबद्धता, आकडय़ांची सहज खेळणं, बुद्धिबळ खेळणे, विविध कोडी सोडवणं हे एकाग्रतेमुळे सहज शक्य होते. प्राणायाम व ध्यान याकडे विद्यार्थी तसेच जर आपण लक्ष देऊन काम केले तर सकारात्मक दृष्टिकोन नक्कीच जाणवतो. योगा करत असताना जर आपण स्वर, ताल यांचा उपयोग केला आणि सांकेतिक योगा याचा आनंद अनुभवला तर आपल्याला दिव्य अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. योगा निसर्गाच्या सानिध्यात घ्यावा जेणेकरून यामध्ये विद्यार्थ्यांना मोकळा श्वास घेण्यासाठी सहज सुलभ स्वच्छ हवा उपलब्ध असेल. आजूबाजूला असलेल्या प्राणी-पक्ष्यांचे आवाज विद्यार्थ्यांना सुखावह करतील. ध्यानधारणा उत्तम पद्धतीने केली जाईल. हे आत्मसात केल्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांमध्ये दुसऱ्यांना समजून घेण्याची भावना वाढीस लागलेली मला दिसून आली. काही विद्यार्थी स्वतः शांत झाले तर ते नियमित अभ्यासदेखील करू लागले, हा फीडबॅक मला माझ्या पालकांकडून ऐकायला मिळाला. काही पालकांनी मला त्यांचे अनुभवदेखील सांगितले. ज्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांची भावनांची प्रगती झालेली आहे. स्वतःवर नियंत्रण आलेले आहे. कौशल्यात विकास झालेला आहे हे योगसाधना, ध्यानधारणा व प्रार्थना यातून आम्हाला दिसून आले.

([email protected])
(लेखिका क्रीडा शिक्षिका आहेत.)