आंबा घाटात दख्खन येथे दरड कोसळली; ढिगारे हटविण्याचे काम युद्धपातळीवर

संगमेश्वर-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटातील दख्खननजीक दरड कोसळली असून दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मातीच्या ढीगाऱ्या खाली दख्खन गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या नळपाणी योजनेची पाईपलाइन गाडली गेली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू आहे.

या मार्गाच्या वरच्या बाजूने कटिंग केलेल्या डोंगराला भेगा गेल्या असून ती माती खाली येण्याचा धोका निर्माण झाला आहे. येथून वाहणाऱ्या ओहोळाचे पाणी सिमेंट नाले गाळाने भरल्याने रोडवरून वहात आहे. रवी इन्फ्रा कंपनीचे कर्मचारी या ठिकाणी वाहतूक अखंडित रहावी यासाठी यंत्रसामग्री सहित सज्ज असले तरी त्यांच्या नियोजनाचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत आहे.