
देशातील हुकूमशाहीविरुद्ध आज लोकशाहीवादी संघटनांच्या आणि विचारांच्या योद्ध्यांनी एल्गार पुकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी कितीही अघोरी कृत्ये केली तरी लोकशाहीचा खून करू शकत नाही, कारण समाज अजून जिवंत आहे, असा गर्भित इशारा या वेळी लोकशाहीवादी नेत्यांनी दिला.
मुंबई मराठी पत्रकार संघात फ्रेंड्स ऑफ डेमोक्रसीतर्फे हुकूमशाहीविरुद्ध सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, श्वेता संजय भट, खासदार कुमार केतकर, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरेंडर झाले तो दिवस आणीबाणीपेक्षाही काळा दिवस होता, असा हल्ला या वेळी संजय राऊत यांनी केला. इंदिरा गांधींनी जाहीर केलेली आणीबाणी ही त्या वेळी देशाची गरज होती. तो संविधानाने दिलेला अधिकार होता, असे ते म्हणाले.
देशात काळा अध्याय कुठला असेल, तर तो मागच्या 11 वर्षांचा असेल, असे ते म्हणाले. श्वेता भट यांनी त्यांचे पोलीस अधिकारी पती संजय भट यांनी मोदींच्या हुकूमशाहीविरुद्ध आवाज उठवल्याने त्यांना गेली सात वर्षे तुरुंगात डांबले गेल्याचे सांगितले. हर्षवर्धन सपकाळ, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, कुमार केतकर यांनीही या वेळी मोदी सरकारच्या हुकूमशाहीचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.