
दहा वर्षांपूर्वी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजनाचा नारळ वाढवणाऱ्या फडणवीस सरकार व रेल्वे प्रशासनाला आज प्रवाशांनी गांधीगिरीने जागे करण्याचा प्रयत्न केला. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने सावंतवाडी रेल्वे स्थानकावर खास मालवणी सेलिब्रेशन केले. यात मोठय़ा संख्येने प्रवाशी सहभागी झाले. प्रवाशांनी अधिकाऱयांना साखर वाटली आणि भूमिपूजन केलेल्या दगडाचा केक कापून तो भरवला.
सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजनाला आज 27 जून रोजी 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, अद्यापही हे टर्मिनस पूर्ण न झाल्याने कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने संताप व्यक्त करत सरकारचा निषेध केला. दहा वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या या भूमिपूजनाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असले तरी दुसऱया टप्प्यातील काम अजूनही रखडलेले आहे. त्यामुळे हे महत्त्वाकांक्षी टर्मिनस दहा वर्षांनंतरही धूळ खात पडले आहे.
रेल्वे प्रवासी संघटनेने यापूर्वीही टर्मिनसच्या कामासाठी अनेक आंदोलने केली आहेत. मात्र, लोकप्रतिनिधी या गंभीर विषयावर गप्प का आहेत? असा सवाल संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. या पार्श्वभूमीवर, भूमिपूजनाला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रेल्वे प्रवासी संघटनेने स्टेशनवर जमून प्रवाशांना आणि रेल्वे कर्मचाऱयांनी साखर वाटली. तसेच ज्या शिळेवर नारळ पह्डून भूमिपूजन झाले होते, त्याच शिळेच्या प्रतिकृतीचा केक कापून निषेध व्यक्त केला. या वेळी संघटनेचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी गणेशोत्सवापूर्वी रेल्वे टर्मिनसचे काम पूर्ण करून चाकरमान्यांची गैरसोय टाळण्याची मागणी केली.
दहा वर्षे झाली तरी हा प्रकल्प रखडलेला आहे. राज्यात एकाच पक्षाची सत्ता असूनही काम पूर्ण होत नसेल तर हे दुर्दैवी आहे. सरकारला जाग आणण्यासाठी आणि अर्धवट कामाची जाणीव करून देण्यासाठी हे आंदोलन केले आहे. केवळ रेल्वेमंत्री बदलले म्हणून प्रकल्प रखडवणे योग्य नाही. जर प्रकल्प पूर्ण करायचा नसेल तर जनतेची फसवणूक केल्याचे जाहीर करा. – अॅड. संदीप निंबाळकर, अध्यक्ष, कोकण रेल्वे प्रवासी संघटना
सिंधुदुर्गातील प्रवाशांनी खास मालवणी पद्धतीने कधीही न अवतरलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा दहावा वाढदिवस अधिकाऱयांना साखर वाटून आणि केक भरवून साजरा केला.