गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्तच, पालकमंत्री फडणवीसांचा दावा फोल

फाईल फोटो

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च 2026 पर्यंत संपूर्ण देश नक्षलमुक्त करण्याचे जाहीर केले आहे तर उत्तर गडचिरोलीतून नक्षलवाद संपुष्टात आणल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनात केला होता. पण गृह विभागाने आज संपूर्ण गडचिरोली जिल्हाच नक्षलग्रस्त म्हणून जाहीर केला आहे. त्यामुळे पालकमंत्री असलेल्या फडणवीस यांच्या गडचिरोली जिह्यात नक्षलवाद कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

केंद्र सरकारच्या नक्षलग्रस्त भागाच्या यादीनुसार तपासणी करून नक्षलग्रस्त भागाचा फेरविचार करण्याच्या सुचना मंत्रिमंडळातील सदस्यांनी केल्या होत्या. त्याला अनुसरून राज्याच्या पोलिस महासंचालकांनी राज्यातील नक्षलग्रस्त भाग घोषित करण्याबाबतचा प्रस्ताव सरकारला सादर केला होता. या पार्श्वभूमीवर राज्यातील सध्याची स्थिती लक्षात घेता संपूर्ण गडचिरोली जिल्हा आणि गोंदिया जिह्यातील गोंदिया, सालेकसा, देवरी व अर्जुन मोरगाव हे चार तालुके नक्षलग्रस्त म्हणून जाहीर केले आहेत.

2024मध्ये नागपूरमध्ये झालेल्या अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील पुढील तीन वर्षात नक्षलवादाचे संपूर्ण उच्चाटन होईल असे सांगितले होते. उत्तर गडचिरोलीतून नक्षलवाद संपुष्टात आणल्याचा दावा करीत पुढील तीन वर्षात दक्षिण गडचिरोलीतून नक्षलवाद संपवू अशी घोषणा केली होती.