झारीतील शुक्राचार्य कोण? पबला कोणाचा आशीर्वाद? खासदाराचा भाजपला घरचा आहेर

पुणे शहरातील जीवन हलाखीचे झाले आहे. नागरी इंडेक्स खालावला आहे. पुण्यातून हडपसरला पोहोचायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात माणूस मुंबईला पोहोचतो. विकास आराखड्यानुसार रस्ते विकसित होत नसल्याने निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे पुण्यातील राहणीमानाचा दर्जा खालावला आहे. अशा बुडणाऱ्या जहाजाचे कॅप्टन आयुक्तांना केल्याची टीका करत खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.

खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी नबनियुक्त महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा करून ते सोडवण्याची मागणी केली.

पुण्यातील नागरी जीवन हलाखीचे झाले आहे. नागरी इंडेक्स खालावला आहे. नागरी समस्या सोडवण्यासाठी डॅशबोर्ड तयार करण्याच्या सूचना कुलकर्णी यांनी आयुक्तांना केल्या. पत्रकार परिषदेस जयंत भावे, राहुल शेवाळे उपस्थित होते.

डॉ. कुलकर्णी म्हणाल्या, कोथरूड आणि शहरातील रस्त्यांवर वाहतूककोंडी नित्याचा भाग झाला आहे. विकास आराखड्याची केवळ पंचवीस टक्के अंमलबजावणी होते, अतिक्रमणावर कठोर कारवाई करावी आणि विकास आराखड्यातील रस्त्यांचे वेगाने रुंदीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना त्यांनी आयुक्तांना केली.

झारीतील शुक्राचार्य कोण?

मार्केटयार्ड येथील गंगाधाम चौकात प्राणांतिक अपघात होत आहेत. येथील उड्डाणपुलाच्या कामाला मंजुरी देऊन वर्ष झाले आहे. पण पुलाचे काम का होत नाही? या पुलाच्या कामाला खोडा घालणारे झारीतील शुक्राचार्य कोण? असा सवाल डॉ. कुलकर्णी यांनी उपस्थित केला.

पबला कोणाचा आशीर्वाद?

कल्याणीनगर परिसरातील रूफटॉपवर बेकायदा हॉटेल्स, क्लब सुरू आहेत. रात्री उशिरापर्यंत साऊंड सुरू असतात. येथील पन्नासहून अधिक सोसायट्यांनी याबाबत तक्रार केली आहे. मात्र, त्याकडे प्रशासन डोळेझाक करत आहे. त्यावर कारवाई करायची जबाबदारी जेवढी पोलिसांची आहे तितकीच महापालिकेची आहे, असेही आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्याचे डॉ. कुलकर्णी म्हणाल्या. दरम्यान, मी पुणेकरांसाठी कायमच आवाज उठवत आले आहे. पुणे बकाल झाले हा आमचा नाही तर प्रशासनाचा दोष आहे, असेही त्या म्हणाल्या.

नदीकाठ सुधारमुळे मुळा -मुठाचाही नाला होईल

नदीकाठ सुधार प्रकल्प हा महापालिकेचा आहे. पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले आणि नदीला पूर येण्याचा धोका वाढला. नाईक बेटाजवळील नदीचा एक प्रवाह बंद करण्यात आला आहे. पुढे या नदीचा राम नदीप्रमाणे नाला होईल, अशी भीती डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केली. नदीकाठाभोवती बांधकाम परवानगी देताना नैसर्गिक ब्ल्यू आणि रेड लाईननुसार परवानगी द्यावी, अशी मागणी आयुक्तांकडे केल्याचेही त्यांनी नमूद केले.