
एअर इंडिया विमानांच्या सुरक्षेचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. अहमदाबादच्या दुर्घटनेनंतरही बिघाडाचे सत्र सुरुच असून शुक्रवारी रात्री आणखी एका विमानाच्या केबिनमध्ये जळण्याचा वास आला. त्यामुळे आग लागण्याची भिती निर्माण झाल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. मुंबई विमानतळावरुन चेन्नईच्या दिशेने उड्डाण घेतलेले विमान सुरक्षेच्या कारणास्तव तातडीने पुन्हा मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले.
एअर इंडियाचे एआय 639 हे विमान शुक्रवारी रात्री मुंबईहून चेन्नईला जात होते. आग लागण्याच्या शक्यतेने वैमानिकाने प्रसंगावधान दाखवले आणि सावधगिरीचा उपाय म्हणून विमान पुन्हा मुंबई विमानतळावर परत आणले. विमानाचे सुरक्षितपणे लॅण्डींग केल्याची माहिली एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिली. अनपेक्षित व्यत्ययामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.
संबंधित विमानातील एका प्रवाशाने सोशल मीडियात यासंदर्भात पोस्ट शेअर केली. एअर इंडियाच्या विमानाने शुक्रवारी रात्री 11.50 वाजता उड्डाण केले होते. उड्डाण करुन सुमारे 45 मिनिटे झाली आणि केबिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगून वैमानिकाने विमान पुन्हा मुंबई विमानतळावर नेले जात असल्याचे जाहीर केले. आम्ही रात्री 12.47 वाजण्याच्या सुमारास सुरक्षितपणे उतरलो, असे विमानातील प्रवासी उत्सव तिवारी यांनी सांगितले.