अकरावी प्रवेशाची पहिली यादी आली, सोमवारपासून प्रवेश सुरू

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची गुणवत्ता यादी आज जाहीर झाली असून पहिल्या प्रवेश फेरी अंतर्गत 6 लाख 32 हजार 194 विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कॉलेज अलॉट करण्यात आले आहेत. त्यात कला शाखेच्या 1 लाख 49 हजार 791 विद्यार्थ्यांचा, वाणिज्य शाखेच्या 1 लाख 39 हजार 602 विद्यार्थ्यांचा तर विज्ञान शाखेच्या 3 लाख 42 हजार 801 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

राज्याच्या माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयातर्फे इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात नवीन प्रकटन शनिवारी प्रसिद्ध करण्यात आले. त्यानुसार 28 जून रोजी सायंकाळी 5 वाजता विद्यार्थ्यांची प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. तर विद्यार्थ्यांना 30 जून ते 7 जुलै या कालावधीत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करता येणार आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या फेरीसाठी 9 जुलै रोजी रिक्त जागा प्रदर्शित केल्या जाणार आहेत, अशी माहिती राज्याचे माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी कळविले आहे.

अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी राज्यभरातील विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार पहिल्या प्रवेश फेरीसाठी 10 लाख 66 हजार 5 विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यात कला शाखेच्या 2 लाख 31 हजार 356 विद्यार्थ्यांनी, तर वाणिज्य शाखेच्या 2 लाख 24 हजार 931 विद्यार्थ्यांनी आणि विज्ञान शाखेच्या 6 लाख 9 हजार 718 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले होते. अर्ज केलेल्या 10 लाख 66 हजार 5 विद्यार्थ्यांपैकी 6 लाख 32 हजार 194 विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या पसंती क्रमांकानुसार पहिल्या फेरीसाठी कॉलेज अलॉट करण्यात आले आहेत.

शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना 30 जून ते 7 जुलै या कालावधीत प्रत्यक्ष प्राप्त महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेता येणार आहे. पसंतीक्रम भरण्यासाठी 10 पर्याय उपलब्ध होते. त्यानुसार 4 लाख 57 हजार 841 विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या पहिल्या पसंतीक्रमानुसार प्रवेश मिळाला आहे. तर 77 हजार 99 विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या दुसरा पसंतीक्रमानुसार प्रवेश मिळाला.