
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. सध्या पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी अधूनमधून जोरदार सरी बरसत असून पावसासोबत तापाचाही जोर वाढल्याचे चित्र आहे. विविध रुग्णालयांत येणाऱ्या सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांमध्ये डेंग्यू आणि मलेरियाचे जवळपास 30 टक्के रुग्ण आढळत असून व्हायरल तापाचे 20 ते 25 टक्के रुग्ण आढळत आहेत. याशिवाय गॅस्ट्रो आणि पोटाशी निगडित आजाराच्या रुग्णांचीही संख्या लक्षणीय असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.
रुग्णालयांच्या ओपीडीमध्ये व्हायरल तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर येत आहेत. थंडी भरून ताप येण्याचे प्रमाण मोठे आहे. अनेक रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे या रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घ्यावे लागत आहे. त्यानंतर डेंग्यू, मलेरिया किंवा टायफॉईड असण्याच्या शक्यतेमुळे रक्तचाचणी करण्यात येत आहे.
पाणी उकळून प्या. ताप अंगावर काढू नका. व्हायरल असला तरीही जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड असे आजार सध्या बळावत चालले आहेत. त्यामुळे अंगदुखी, कणकण, थंडी भरून ताप येणे, सांधेदुखी, मळमळ, उलट्या, डोकेदुखी, भूक मंदावणे, घसा कोरडा पडणे अशी लक्षणे जाणवत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. रक्तचाचणी करून घ्या, असे शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले.
ग्रस्ट्रोचे रुग्णही वाढले
पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन अनेक ठिकाणी गळक्या आहेत. पाणीचोरीही मोठ्या प्रमाणावर होत आहे. मुसळधार पावसात अशा गळक्या पाईपलाईनमधून दूषित पाणी घराघरात गेल्याची शक्यता आहे. अशा दूषित पाण्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयांमध्ये कावीळ किंवा गॅस्ट्रोची लागण झालेले रुग्णही येत आहेत, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
रुग्णालयांकडून दक्षता
पावसाळा सुरू झाल्यामुळे साथीचे आजार बळावू नयेत यासाठी महापालिका रुग्णालयांकडूनही खबरदारी घेतली जात आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत पालिकेकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. तसेच पालिका रुग्णालयांच्या माध्यमातून नागरिकांना आठवड्यातून एकदा डॉक्सी या गोळ्या देण्यात येत आहेत, अशी माहिती पालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.